शंकरपटाच्या बंदीमुळे नाराजी
By Admin | Updated: May 19, 2015 00:17 IST2015-05-19T00:17:06+5:302015-05-19T00:17:06+5:30
न्यायालयाने शंकरपटावर बंदी घालून शेतकऱ्यांचा हिरमोड केला आहे. जो शेतकरी आपल्या बैलांना उत्कृष्ट खाद्य...

शंकरपटाच्या बंदीमुळे नाराजी
सशक्त बैलजोड्या घडणार कशा ? : शेतकऱ्याचे करमणुकीवर विरजण
तळेगाव दशासर : न्यायालयाने शंकरपटावर बंदी घालून शेतकऱ्यांचा हिरमोड केला आहे. जो शेतकरी आपल्या बैलांना उत्कृष्ट खाद्य घालून त्याची मुलाप्रमाणे जोपासना करतो. मात्र शंकरपटाच्या माध्यमातून त्यांची परवड होत होती. हा प्रकार थांबविण्यासाठी न्यायालयाने बंदी घालण्याचा निर्णय घेतला. परंतु यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
शंकरपटाच्या निमित्ताने घडविलेला बैल उत्तम सशक्त चपळ व शेती कामासाठी उत्कृष्ट असतो. बहुतांश शेतकरी अल्पवयीन गोऱ्ह्यास बदाम दुध, लोण्याचे गोळे, कणकीचे ऊंडे व अंडी चारून धष्टपुष्ट, चपळ व गुळगुळीत बनवून शर्यतीत उत्तम धारण्यायोग्य बनवतात. त्यामुळे त्याची किंमत वाढते. एरवी ३० ते ४० हजारांपर्यंतचा बैल घडविल्यानंतर चार ते पाच लाखांपर्यंत विकला जातो. अशा बैलाचा शेतकरी छळ कसा करू शकेल, शिवाय शेतकरीच बैलाच्या स्पर्धा भरवून उत्कृष्ट वायुवेगाने धावणाऱ्या जोडीसाठी हजारो रूपयांची बक्षिसे ठेवतात. त्याचाही फायदा शेतकऱ्यांनाच होतो. आई-वडील जसे लहान मुलांची जोपासना करून लहानाचे मोठे करून कमविता बनवतात. तसेच शेतकरी आपल्या गोऱ्ह्यांची खाण्यापिण्याची योग्य निगा राखून त्यास अंगाने व धावण्यास चपळ बनवितात. त्या बैलांना इजा पोहोचू देत नाही. त्याला योग्यवेळी व्हेटरनरी डॉक्टर्सकडून तपासून वेळेवर माणसाप्रमाणे औषध-पाणी देऊन त्याची विशेष काळजी घेतात.
पूर्वी करमणुकीची साधने नसल्याने पारावरच्या गप्पांमधूनच शंकरपटाची संकल्पना पुढे आली. खेडे विभागात आजही करमणुकीची साधने नाहीत, करमणूक म्हणून हा शेतकऱ्यांचा छंदच म्हणावा लागेल. २० व्या शतकात जरी आमुलाग्र बदल झाला तरी खेड्यातून मोबाईल, टीव्ही शिवाय दुसरे करमणुकीचे साधन नाहीत. तो बैलांनाच देव मानून पोळ्याला अंगावर साज घालून त्याची पूजा करतो. शेतकऱ्यांनी जर बैलाविषयी क्रूरता दाखविली असती तर असा उत्कृष्ट व चपळ बैल तयार करू शकला नसता. अशा बैलाची राहण्याची व स्वच्छतेची उत्तमरीत्या काळजी घेतली जाते. गोचीड-गोमाशा अंगावर किंवा गोठ्यात होऊ न देता सायबरमेथीन औषधाची फवारणी करून त्या कीटकांचा नाश केला जातो. त्याची दररोज साबणीने अंघोळ करून स्वच्छता राखली जाते. तसेच शेण मलमूत्राची व्यवस्था केली जाते व थंडी, ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण केले जाते. त्याची निगा राखण्यासाठी स्पेशल गडी ठेवली जाते. (वार्ताहर)
कत्तलखान्यावर निर्बंध नाही
एकीकडे प्राण्यांची कत्तल होत असताना व कत्तलखाने वाढत असताना त्यावर निर्बंध नाही. या कत्तलखान्यामुळे गुराढोरांच्या संख्येत कमालीची घट झाली असून गायी गुरांनी भरलेले वाडे नेस्तनाबूत झालेले दिसत आहे. गोठे नुसतेच गोठे राहिले आहेत. श्रीमंतांचे वाड्यात पोळ्याचे पूजनासाठीसुद्धा बैल दिसत नाही व गाई-म्हशीचे प्रमाणही अत्यल्प झाले त्याचा परिणाम दूध-दुभत्यावर दिसून येत आहे व शेतीवरही शेणखत कमी आल्याने उत्पन्नात घट झाली असून शेतकऱ्यांसाठी दुय्यम धंदा असलेल्या पशुपालन व दुग्ध व्यवसाय अडचणीत येत आहे. त्यापासून शेतकरी दुरावत असून आत्महत्येकडे वळत आहे.
पटाला गौरवशाली परंपरा
तळेगावचा शंकरपट हा महाराष्ट्रात प्रसिद्ध असून पटाच्या निमित्ताने भव्य यात्रा भरते. या यात्रेत शेतीपयोगी सर्व वस्तू किफायतशीर भावात मिळतात. या पटात बैलावर कोणताही क्रूर अत्याचार पूर्वीपासून केला जात नाही. या क्रूरतेविषयी प्रत्यक्ष खात्री करूनच निर्णय घेऊन शेतकऱ्याचे नैराश्य दूर करावे, अशी परिसरातील शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.