गणेश वासनिक अमरावती : आदिवासी विकास विभागाच्या अमरावती अपर आयुक्त कार्यालयांतर्गत १३ जिल्ह्यांमध्ये शिक्षक, प्रयोगशाळा सहायक, मुख्याध्यापक, अधीक्षक, लिपिक आदी ४२९ पदांच्या समुपदेशनाने ‘फेस टू फेस’ नियतकालिक बदल्या करण्यात आल्या आहेत. एकूण २८ संवर्गात कार्यरत पदांच्या ३० टक्केच्या मर्यादेत बदलीपात्र ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांना पसंतीनुसार नियुक्ती देण्यात आली आहे. यंदा एकही तक्रार न येता ही बदली प्रक्रिया राबविण्यात आली आहे.
शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया म्हटले की, तक्रार, भानगडी, न्यायालयीन प्रकरणे ही घडतातच. मात्र, ‘ट्रायबल’च्या अमरावती एटीसी कार्यालयाने धारणी, पांढरकवडा, अकोला, छत्रपती संभाजीनगर, पुसद, कळमनुरी या सातही एकात्मिक प्रकल्पांतर्गत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या २०, २१ आणि २२ मे २०२५ या तीन दिवशी राबविलेल्या समुपदेशनाद्वारे बदल्या ‘फेस टू फेस’ करण्यात आल्या. पसंतीक्रमानुसार बदली ठिकाणच्या नियुक्तीला प्राधान्य देण्यात आले. तसेच अवघड आणि बिगर अवघड क्षेत्रनिहाय याद्या २० मार्च २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आल्यामुळे बदलीपात्र कर्मचाऱ्यांची ओरड दिसून आली नाही.
या संवर्गात झाल्या बदल्याप्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, कनिष्ठ लिपिक, उपलेखापाल, अदिवासी विकास निरीक्षक, कार्यालय अधीक्षक, संशोधन सहायक, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक, गृहपाल आदींचा समावेश आहे. २८ संवर्गात एकूण कार्यरत पदांच्या ३० टक्के मर्यादेत ४२९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.
अमरावती एटीसीच्या नावे कर्मचारी संघटनेचे प्रशस्तीपत्रआदिवासी विकास विभाग, अमरावतीच्या अपर आयुक्त कार्यालयाने भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक पद्धतीने समुपदेशाद्वारे सन २०२५ च्या नियतकालिक बदल्या केल्याबद्दल आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेने ६ जून २०२५ रोजी अपर आयुक्त जितेंद्र चौधरी यांच्या नावे अमरावती विभागाला प्रशस्तीपत्र दिले आहे. संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, कार्याध्यक्ष एस. जे. शेवाळे, सरचिटणीस प्रा. बी. टी. भामरे यांच्यासह नागपूर विभागीय अध्यक्ष रामदास खवशी, ठाणे विभागीय अध्यक्ष डॉ. प्रमाेद पोगरे, अमरावती विभागीय अध्यक्ष डॉ. अशाेक झुंझारे, नाशिक विभागीय अध्यक्ष अमोल वाबळे यांनी बदली प्रक्रियेचे कौतुक केले आहे.
"कर्मचाऱ्यांची ‘फेस टू फेस’ म्हणेल त्या जागेवर आणि पसंतीनुसार समुपदेशनाद्वारे बदली करण्यात आली. त्यामुळे यंदा कोणाचीही ओरड नाही. पारदर्शकपणे आणि नियमानुसार बदल्या झाल्यामुळे विभागाला गालबोट लागले नाही."- जितेंद्र चौधरी, अपर आयुक्त, अमरावती ‘ट्रायबल’