अमरावतीकरांमध्ये चोरट्यांची दहशत
By Admin | Updated: June 12, 2014 23:42 IST2014-06-12T23:42:57+5:302014-06-12T23:42:57+5:30
पोलिसांच्या नाकावर टिचून शहरात घरफोडीच्या मालिका सुरुच आहेत. दरदिवसाला चोरीच्या घटनांमधून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला जात आहे. चोरट्यांच्या हैदोसामुळे अमरावतीकर चोरट्यांच्या दहशतीत आले आहेत.

अमरावतीकरांमध्ये चोरट्यांची दहशत
अमरावती : पोलिसांच्या नाकावर टिचून शहरात घरफोडीच्या मालिका सुरुच आहेत. दरदिवसाला चोरीच्या घटनांमधून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला जात आहे. चोरट्यांच्या हैदोसामुळे अमरावतीकर चोरट्यांच्या दहशतीत आले आहेत. मात्र चोरीच्या घटना रोखण्यात आतापर्यंत पोलिसांना यश मिळाले नाही. एक महिन्यातील वाढत्या गुन्हेगारींच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लावले जात आहे.
उन्हाळी सुट्या, लग्न सराईचा मोसम असल्याने बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या वाढत असल्याची संधी साधून चोरटे बंद घरांना लक्ष्य करीत आहेत. चोरट्यांनी महिनाभरात शहरातील राजापेठ, फे्रजरपुरा व गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चेन स्नॅचिंग, घरफोडी व दरोडे टाकून करोडो रुपयांचा ऐवज लंपास केला. परंतु या टोळीला पकडण्यासाठी अद्यापही पोलिसांना यश आले नाही. यासाठी रात्रकालीन गस्त वाढविण्यात आली परंतु ही गस्त कुचकामी ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पूर्वी चार्ली कमांडो शहरात १२ तास गस्त घालत होती. कमांडोंना काही विश्रांती मिळण्यासाठी त्याची गस्त १२ तासांवरुन आठ तास करण्यात आली. घरफोडींच्या घटनांवर आळा बसविण्यासाठी चार्ली कमांडोना निर्देश देण्यात आले. परंतु कमी तासांची ड्युटी असतानाही चार्ली कमांडो कामचुकारपणा करीत असल्याचे वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवरुन स्पष्ट होते. ते रात्रकालीन गस्त करण्याऐवजी घरी झोपा काढत असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या चौकशीत उघड झाले आहे. पोलीस ठाण्यातील डीबी स्कॉड व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही कुचकामी ठरत आहेत. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.