‘स्मार्ट’ होण्यास अमरावती सज्ज
By Admin | Updated: August 1, 2015 01:33 IST2015-08-01T01:33:04+5:302015-08-01T01:33:04+5:30
देशात १०० स्मार्ट सिटीज उभ्या करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर या योजनेत राज्यातील १० शहरे समाविष्ट करण्यासाठी...

‘स्मार्ट’ होण्यास अमरावती सज्ज
अखेर निवड झाली : राज्यात स्मार्ट सिटी योजनेतील १० शहरांची नावे घोषित
अमरावती : देशात १०० स्मार्ट सिटीज उभ्या करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर या योजनेत राज्यातील १० शहरे समाविष्ट करण्यासाठी शासनाने प्रस्ताव मागविले होते. त्यानुसार शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० शहरांची नावे जाहीर करताना स्मार्ट सिटीत अमरावतीचे नाव समाविष्ट असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मोठ्या शहराच्या रांगेत आता अमरावतीचा नामोल्लेख आवर्जून केला जाईल, हे विशेष.
राज्य सरकारच्या उच्चाधिकार समितीने निवड केलेल्या स्मार्ट सिटीतील १० शहरांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढ्यात ठेवली. त्यानुसार या शहरांची नावे घोषित करताना मुख्यमंत्र्यांनी अमरावती शहराचे नाव जाहीर करताना त्यांनी मामाच्या गावाला आगळीवेगळी भेट दिल्याचे दिसून आले. आता अमरावती महापालिकेला दरवर्षी ५० कोटी रुपये उभे करावे लागणार आहे. स्मार्ट सिटी या योजनेत सहभागी होण्यासाठी २६ महापालिका तर ११ नगरपरिषदांनी प्रारुप प्रस्ताव तयार करुन स्पर्धेत सहभागी झाले होते. जी शहरे स्वत: च्या ताकदीवर ५० कोटी वर्षाला उभे करू शकतील, त्यांचाच समावेश करण्यात आला होता.
राज्य शासनाने घोषित केलेल्या १० शहरांच्या यादीला केंद्र शासनाची मान्यता मिळाल्यानंतरच डीपीआर तयार करण्यासाठी तज्ञांची एजन्सी नेमली जाईल. (प्रतिनिधी)
पुढील वर्षी मिळेल अनुदान
पहिल्या टप्प्यात १० शहरांचा स्मार्ट सिटीत समावेश झाल्यानंतर राज्य शासन त्रयस्थ एजन्सींच्या माध्यमातून निवड झालेल्या शहराची चाचपणी करेल. प्रस्तावात नमूद बाबी संबंधित शहर पूर्ण करू शकणार अथवा नाही, ही पाहणी करेल. त्यानंतर ३१ डिसेंबरपर्यंत राज्य शासन केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविणार आहे. पुढील वर्षी मार्च १०१६ च्या अर्थसंकल्पात स्मार्ट सिटी अनुदानासाठी केंद्र शासन तरतूद करेल, अशी माहिती आहे.
झोपडपट्टीमुक्त शहराची संकल्पना
अमरावती शहर झोपडपट्टीमुक्त केले जाईल. शहरात १०२ घोषित झोपडपट्ट्या आहेत. स्लम मुक्त शहर निर्माण होईल. जुन्या व अविकसित वस्त्यांचे पुनर्गठन केले जाईल. सर्व जाती धर्मातील गरीब, सामान्य कुटुंबीयांना घर देण्याचे प्रस्तावित आहे.
२४ तास शहराला पाणीपुरवठा
‘स्मार्ट’ होणाऱ्या अमरावती शहराला येत्या काळात २४ तास पाणीपुरवठा नागरिकांना मिळेल. सार्वजनिक स्टॅन्ड पोस्ट बंद करुन त्याऐवजी नागरिकांना नळ कनेक्शन दिले जाईल. गरजेनुसार वापर या संकल्पनेतून पाणी पुरवठा होईल.
पीपीपी तत्त्वावर विकास
स्मार्ट सिटीत अमरावती शहराचा विकास करण्याचे प्रस्तावित आहे. त्यानुसार पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनर) सायबर सिटी उभारुन मोठ्या नामांकित कंपन्यांना पाचारण केले जाईल. या कंपन्याच्या भागीदारीतून उद्योगधंदे साकारले जातील.