Amravati: नव्वद वर्षीय आजीने दिला पेपर, मात्र ७ हजार निरक्षर गैरहजर
By जितेंद्र दखने | Updated: March 18, 2024 23:41 IST2024-03-18T23:41:25+5:302024-03-18T23:41:39+5:30
Amravati News: नवभारत साक्षरता कार्यक्रमात पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी जिल्हाभरातील १ हजार ६०३ परीक्षा केंद्रांवर रविवारी, १७ मार्च रोजी पार पडली. उल्लास ॲपवर सुमारे ३१ हजार ६९७ असाक्षरांची नोंदणी करण्यात आली आहे.

Amravati: नव्वद वर्षीय आजीने दिला पेपर, मात्र ७ हजार निरक्षर गैरहजर
- जितेंद्र दखणे
अमरावती - नवभारत साक्षरता कार्यक्रमात पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी जिल्हाभरातील १ हजार ६०३ परीक्षा केंद्रांवर रविवारी, १७ मार्च रोजी पार पडली. उल्लास ॲपवर सुमारे ३१ हजार ६९७ असाक्षरांची नोंदणी करण्यात आली आहे. यापैकी २४ हजार ६५२ परीक्षार्थ्यांपैकी १६ हजार ८७५ महिला व ७ हजार ७७७ पुरुष परीक्षार्थ्यांनी परीक्षेला हजेरी नोंदवित पेपर सोडविला आहे. विशेष म्हणजे नव्वद वर्षीय आजीबाईने दिला पेपर मात्र ७ हजार ४५ जण परीक्षेला गैरहजर होते. नवभारत साक्षरता अभियानांतर्गत नोंदणी झालेल्या प्रौढ निरक्षरांची रविवारी एकाचवेळी राज्यभरात परीक्षा घेण्यात आली. केंद्र सरकारने शिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून ही परीक्षा आयोजित केली होती. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कधीही परीक्षा केंद्रांवर या अन् परीक्षा द्या, अशी सवलत देण्यात आली होती. त्यामुळे विविध गावांतील नोंदणीकृत निरक्षर सकाळीच शेती कामासाठी गेले. अन् दुपारी जेवण आटोपून परीक्षा केंद्रांवर हजेरी नोंदवित परीक्षा दिली
नव्वद वर्षीय लिलाबाईनी सोडविला पेपर
नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत रविवारी पार पडलेल्या चापणीत परीक्षेत मोर्शी तालुक्यातील शिरखेड केंद्रातंर्गत येणाऱ्या सावरखेड या केंद्रावर लिलाबाई गाेरखनाथ हिरडे या नव्वद वर्षीय आजीबाईनी पेपर सोडविला.या आजीबाईचे केंद्रप्रमुख अब्दुल राजिक हुसेन यांनी पुष्पगुच्छ देवून गौरव केला.
पुरुषांपेक्षा महिला उत्साही
नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात महापालिका क्षेत्रासह १५ तालुक्यांत १७ मार्च रोजी घेण्यात आलेल्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणीला उल्लास ॲपवरील नोंदणी केलेल्या ३१६९७ पैकी २४ हजार ६५२ निरक्षरांमध्ये सर्वाधिक १६ हजार ८७५ महिलांनी परीक्षेला हजेरीला लावली होती. तर ७ हजार ७७७ पुरुष मात्र परीक्षेत सहभाग नोंदविला. त्यामुळे या परीक्षेत महिलांचा सहभाग अन् उत्साह अधिक असल्याचे दिसून आले.
‘उल्लास ॲप’वर अशी आहे नोंदणी
एकूण नोंदणी ३१६९७
महिला-२१२५०
पुरुष-१०४४७
नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ‘उल्लास ॲप’वर सुमारे ३१ हजार ६९७ जणांची नोंदणी झाली आहे. यापैकी २४ हजार ६५२ जणांनी १६०३ परीक्षा केंद्रांवर परीक्षा दिली आहे. मात्र, ७ हजार ४२ परीक्षार्थी परीक्षेला गैरहजर होते.
-सय्यद राजीक, शिक्षणाधिकारी, योजना