अमरावती-मुंबई विमान सेवा सुरु होणार
By Admin | Updated: October 15, 2015 00:19 IST2015-10-15T00:19:44+5:302015-10-15T00:19:44+5:30
बेलोरा विमानतळाचा विकास करण्यासाठी राज्य शासनाने सकारात्मक पाऊल उचलल्यामुळे आता अमरावती-मुंबई विमान सेवा सुरु करण्याचे संकेत ...

अमरावती-मुंबई विमान सेवा सुरु होणार
खासदारांना पत्र : केंद्रीय उड्डयनमंत्री पी. अशोक गजपती राजू यांचे संकेत
अमरावती : बेलोरा विमानतळाचा विकास करण्यासाठी राज्य शासनाने सकारात्मक पाऊल उचलल्यामुळे आता अमरावती-मुंबई विमान सेवा सुरु करण्याचे संकेत केंद्रीय उड्डयनमंत्री पी. अशोक गजपती राजू यांनी दिले आहेत. एअर बससेवा सुरु करण्यास एअर इंडिया पुढाकार घेणार असल्याचे पत्र खा. आनंदराव अडसूळ यांना प्राप्त झाले आहे.
मागील आठवड्यात पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी बेलोरा विमानतळाचा विकास, सौंंदर्यीकरणासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमवेत मुंबईत बैठक घेऊन विमानतळाच्या विकासात येणाऱ्या अडचणी सोडविल्या आहेत. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने बेलोरा विमानतळाच्या विकासाला सहमती दर्शविली आहे. त्यामुळे लवकरच बेलोरा विमानतळावरुन ‘एअरबस’ सेवा सुरु होण्याचे हे संकेत मानले जात आहेत. अमरावती-मुंबई दरम्यान विमानसेवा सुरु केल्यास प्रवासीवर्ग मोठ्या प्रमाणात मिळू शकतो, असे अहवालात म्हटले आहे. मात्र, एअर इंडिया कंपनीची अमरावती-मुंबई विमान सेवा सुरु नाही. आर्थिक उत्पन्नाच्या दृष्टीने विचार केल्यास ही विमानसेवा फायदेशीर ठरणार, असे विमानतळ प्राधिकरणाने केंद्राकडे पाठविलेल्या अहवालात नमूद केले आहे.
मात्र, खा.अडसूळ यांनी बेलोरा विमानतळाचा विकास करण्यासह येथून छोट्या स्वरुपाची विमानसेवा सुरु करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. याच धर्तीवर केंद्रीय उड्डयनमंत्री पी. अशोक गजपती राजू यांनी खासदार अडसुळांना पत्र पाठवून विमानसेवा सुरु करण्याचे संकेत दिले आहेत. बेलोरा विमानतळाचे विकास कार्य आटोपले की छोटे विमान सुरु करणे सुकर होईल, असे चित्र आहे. मात्र विमानतळाच्या विकासासाठी निधीची गरज असल्याने राज्य शासनाने हा निधी तातडीने मंजूर करावा, अशी मागणी खा. आनंदराव अडसूळ यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
बेलोरा विमानतळावरुन विमान सेवा सुरु करण्याची फार जुनी मागणी आहे. त्यानुसार वारंवार पत्रव्यवहार सुरुच आहे. केंद्रीय उड्डयनमंत्र्यांनी विमानसेवा सुरु करण्याचे दिलेले संकेत जिल्ह्याच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरतील.
- आनंदराव अडसूळ, खासदार, अमरावती.