अमरावती विभागात पाणीटंचाईची धग कायम!
By Admin | Updated: June 23, 2016 22:17 IST2016-06-23T22:17:49+5:302016-06-23T22:17:49+5:30
अमरावती विभातील ३९१ गावांना ३७७ टँकरवर तहान भागवावी लागत असून दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
अमरावती विभागात पाणीटंचाईची धग कायम!
संतोष वानखडे/वाशिम
पावसाळ्याला दमदार सुरुवात झाली नसल्याने अमरावती विभागात पाणीटंचाईची धग कायम आहे. विभागातील ३९१ गावांतील नागरिकांच्या कोरड्या घशाला पाण्याचा ओलावा देण्यासाठी तब्बल ३७७ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
पर्यावरणाचा र्हास, विविध प्रकारच्या प्रदूषणांमध्ये वाढ व अन्य काही कारणांमुळे ऋतुमानात बदल होत आहेत. आता पावसाळ्याला सुरुवात होऊन १५ दिवसांचा कालावधी उलटला; मात्र अद्याप दमदार पाऊस नसल्याने पाणीटंचाई कायम असल्याचे दिसून येते. टंचाईग्रस्त गावांतील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी या गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.
२0 जून २0१६ रोजीच्या अहवालानुसार, अमरावती जिल्ह्यातील १४ गावांमध्ये १0 टँकर, अकोला जिल्ह्यात ५९ गावांमध्ये ४८ टँकर, वाशिम जिल्ह्यात १0१ गावांमध्ये १00 टँकर, बुलडाणा जिल्ह्यात १३२ गावांमध्ये १४६ टँकर आणि यवतमाळ जिल्ह्यात ८५ गावांमध्ये ७३ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. गतवर्षी २0 जूनपर्यंत अमरावती विभागात केवळ १३८ टँकर सुरू होते. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ९, अकोला २, वाशिम ५५, बुलडाणा २९ आणि यवतमाळ जिल्ह्यातील ४३ टँकरचा समावेश आहे.
अमरावती विभागाप्रमाणेच संपूर्ण राज्यात एकूण ६१३0 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये कोकण विभागातील २७८ गावांमध्ये १२0, नाशिक विभागातील ८७५ गावांमध्ये ११७४, पुणे विभागातील ४७२ गावांमध्ये ४६३ व औरंगाबाद विभागात २९३५ गावांत ३९३८, अमरावती विभागात ३७७ आणि नागपूर विभागातील ३१ गावांमध्ये २८ टँकर असे एकूण ४९८२ गावांमध्ये ६१३0 टँकरने पाणीपुरवठा होत आहे. गतवर्षी २0 जूनपर्यंत १९९९ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. यावर्षी यामध्ये तिपटीने वाढ झाल्याचे दिसून येते.
अमरावती विभागातील जिल्हानिहाय टँकरची स्थिती
जिल्हा टँकर गावे
अमरावती १0 १४
अकोला ४८ ५९
वाशिम १00 १0१
बुलडाणा १४६ १३२
यवतमाळ ७३ ८५
...............................................
एकूण ३७७ ३९१
...............................................
विभागनिहाय टँकरची स्थिती
विभाग टँकर
कोकण १२0
नाशिक ११७४
पुणे ४६३
औरंगाबाद ३९६८
नागपूर २८
अमरावती ३७७
एकूण ६१३0