मेळघाटातील आमनेर किल्ला मरणपंथाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:10 IST2020-12-26T04:10:59+5:302020-12-26T04:10:59+5:30
पुनर्निमाणाची गरज : सात बुरूज शाबूत धारणी : शहरापासून १५ किलोमीटर अंतरावरील भोकरबर्डी शिवाराला लागून मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राची ...

मेळघाटातील आमनेर किल्ला मरणपंथाला
पुनर्निमाणाची गरज : सात बुरूज शाबूत
धारणी : शहरापासून १५ किलोमीटर अंतरावरील भोकरबर्डी शिवाराला लागून मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राची सीमा दर्शविणारी तापी नदी आहे. या नदीच्या गडगा आणि तापी संगमावर प्रसिद्ध आमनेर किल्ला आहे. पुरातन विभागाच्या सतत दुर्लक्षामुळे या किल्ल्याचे सौंदर्य दिवसेंदिवस हरवत चालले आहे. पर्यटक या निसर्गरम्य किल्ल्याच्या भेटीसाठी अधून-मधून येत असतात. सध्या किल्ल्याला तीनही बाजूंनी पाण्याने वेढले असून, केवळ पूर्वेकडून मार्ग आहे. हा किल्ला मोगल काळात संरक्षित मानला जात होता. आता याची पुरातन विभागात नोंद करून पुनर्निर्माणाची आवश्यकता पर्यटनप्रेमींनी केली आहे. बाहेरून सुरेख दर्शन देणारा हा किल्ला आतून मात्र मरणपंथाला टेकलेला आहे.
वर्धा, जाम, वसिष्ठा या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमावर हा किल्ला आहे. आमनेरचा किल्ला अथवा झिल्पी आमनेर किल्ला हा पंचक्रोशीत अपरिचित किल्ला आहे. जिल्ह्याच्या वायव्येला हा किल्ला आहे. आमनेरचा किल्ला तापीनदी आणि गडगा नदी यांच्या संगमावर असलेल्या छोट्याशा टेकडीवजा उंचवट्यावर बांधलेला आहे. गडगा नदीच्या काठावरून आमनेर किल्ल्याचे सुरेख दर्शन घडते. या किल्ल्याला आमनेर हे नाव जवळ असलेल्या आमनेर गावावरून मिळाले आहे. हे आमनेर गाव ब्रिटिश आमदनीत वसाड झाले. गाव उठून गेल्यामुळे त्या गावाची वाटही मोडून गेलेली आहे. गडगा नदी ओलांडून गेल्यावर डावीकडे किल्ल्याचा ढासळत चाललेला बुरूज आपल्याला दिसतो. या बुरूजाकडे चढणाऱ्या वाटेने थोडेसे चढल्यावर उजवीकडील तटबंदीवर चढण्यास वाट आहे. या तुटक्या तटबंदीतून गडात प्रवेश होतो. गडाच्या मध्यभागी मारुतीचे लहान मंदिर आहे. त्यामागे वाड्याचे मोठे जोते शिल्लक असून त्याला मोठे तळघर आहे. चौकोनी आकाराच्या या छोट्याशा आटोपशीर किल्ल्याचे क्षेत्रफळ अगदी कमी आहे. त्यातूनही आत असलेल्या अनेक इमारती काळाच्या ओघात नष्ट झालेल्या आहेत. या किल्ल्यास ८ बुरूज असून त्यापैकी ७ शाबूत आहेत. नदीतील पाण्याच्या माराने एक बुरूज भग्न झाला आहे. काळ्या पाषाणात वितळविलेले शिसे ओतून याचा पाया मजबूत करण्यात आलेला आहे. यात जोडांसाठी चुन्याचा वापर करण्यात आलेला आहे. हा किल्ला १२ व्या ते १३ व्या शतकापासून अस्तित्वात असावा. तीनही बाजुंनी पाणी आणि एका बाजुला खंदक अशी या किल्ल्याची रचना आहे. मात्र पुरातत्व विभागासह महसूल प्रशासनाचे त्यकडे दुर्लक्ष आहे?
गुप्तधनाच्या आशेने खोदकाम
गुप्तधनाच्या आशेने अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात आले. गडाचा मुख्य मार्ग उत्तराभिमुख असून त्या मार्गावरील दरवाजा नष्ट झाला आहे. तटबंदीही बरीचशी ढासळलेली आहे. चार कोपऱ्याला चार आणि मधे दोन दोन बुरूज मिळून किल्ल्याला एकंदरीत १२ बुरुज आहेत. तापी आणि गडगाच्या संगमाकडील बुरुजावरून नदीचे उत्तम दर्शन होते. याच तटबंदीमध्ये तापीनदीकडे जाणाऱ्या मार्गावर एक दिंडी दरवाजा आहे. ती वाट मोडल्यामुळे अवघड झालेली आहे.
ना होडी ना कुठली व्यवस्था
आमनेर किल्ल्याच्या जवळचे गाव म्हणजे भोकरबर्डी. हे गाव बु-हाणपूर ते अमरावती या मार्गावर आहे. आमनेरला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. धारणीकडून आल्यावर शाळा डावीकडे लागते. या शाळेच्या समोरूनच एक कच्चा मार्ग जातो. या कच्च्या मार्गाने दोन किलोमिटर गेल्यावर रस्त्याच्या उजव्या बाजूच्या माळरानावर मारूतीचे लहानसे मंदिर आहे. येथून आमनेर किल्ला दिसू लागतो. येथील पाऊलवाटेने पुढे चालत गेल्यावर गडगा नदीचे पात्र आडवे येते. नदी पात्रातून पाणी कमी असल्यास नदी ओलांडण्यास अडचण येत नाही. नदीला पाणी असल्यास नदी ओलांडणे धोकादायक ठरु शकते. येथे होडी वा नावेची व्यवस्था नाही.