विमानाने करणार वैवाहिक जीवनाचा प्रारंभ
By Admin | Updated: May 19, 2015 00:18 IST2015-05-19T00:18:15+5:302015-05-19T00:18:15+5:30
प्रहार व सत्यशोधक बहुउद्देशीय शिक्षण संस्था, पूर्णामाय अपंग-अनाथ पुनर्वसन केंद्राद्वारा आयोजित सामूहिक विवाह....

विमानाने करणार वैवाहिक जीवनाचा प्रारंभ
१२ आदिवासी जोडपे सहभागी : प्रहारच्यावतीने सामूहिक विवाह सोहळा
चांदूरबाजार : प्रहार व सत्यशोधक बहुउद्देशीय शिक्षण संस्था, पूर्णामाय अपंग-अनाथ पुनर्वसन केंद्राद्वारा आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात १६ जोडपे विवाहबद्ध झाले. यावेळी ३ हजार आप्तस्वकीय व हितचिंतकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सामूहिक विवाह सोहळ्यात १२ आदिवासी जोडपे सहभागी झाले होते. गुरुवारी पार पडलेल्या या सोहळ्यात आ. बच्चू कडू यांच्यातर्फे यशस्वी जोडप्यांना दुचाकी व विमान प्रवासाची अनोखी भेट देण्यात आली. दोन आदिवासी जोडपे बक्षिसांचे मानकरी ठरले. संदीप वाघमारे नानोरी व सुमित्रा बेठेकर काटकुंभ या जोडप्यांना नागपूर-मुंबई असा विमान प्रवासाचा लाभ घेता येणार आहे.
रवींद्र मरकाम जीवनपुरा अचलपूर व चंद्रकला धुर्वे घाटलाडकी या जोडप्याने विवाह संपन्न होताच दुचाकीने आपल्या संसाराचा प्रवास सुरू केला आहे.
दुष्काळात होरपळून निघालेल्या शेतकरी, शेतमजूर व कष्टकऱ्यांची विवाह सोहळ्यातील आर्थिक अडचण दूर करण्यासाठी व यातून उद्भवणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी पूर्णामाय अपंग-अनाथ पुनर्वसन केंद्रात प्रहारच्यावतीने सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. या सामूहिक विवाह सोहळ्यात अचलपूर मतदारसंघातील व त्याबाहेरील १६ जोडप्यांचे ३२ कुटुंब सहभागी झाले होते. यामध्ये एका जोडप्याकडील २०० आप्तेष्टांनी जेवणाची व्यवस्था केली होती. या सोहळ्यात अचलपूर उपविभागासह मध्यप्रदेशातील आदिवासी जोडपेही सहभागी होते.
हा सामूहिक विवाह सोहळा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सुरू केलेल्या गुरूदेव पद्धतीने करण्यात आला.
या विवाह सोहळ्यात सुमारे ३ हजार लोकांनी सामूहिक योजनाचा लाभ घेतला. अडचणीत सापडलेल्या पित्याला मुलींचे विवाह करण्याची चिंंता लागलेली असते, अशा सामूहिक विवाह सोहळ्यामुळे खर्चाची बचत होते. (तालुका प्रतिनिधी)