कृषी सिंचन योजनेचा २० हजार शेतकऱ्यांना फटका
By Admin | Updated: October 9, 2016 01:08 IST2016-10-09T01:08:25+5:302016-10-09T01:08:25+5:30
अमरावती प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी उपलब्धता व्हावे,

कृषी सिंचन योजनेचा २० हजार शेतकऱ्यांना फटका
सर्व्हर डाऊन : आॅनलाईनची मुदत संपली
मोहन राऊत अमरावती
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी उपलब्धता व्हावे, याकरिता आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. मात्र सर्व्हर डाऊन व मुदत संपल्याने जिल्ह्यातील २० हजार शेतकऱ्यांना अर्ज भरता आले नाही. याचा सर्वाधिक फटका धामणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे़
शेती हा व्यवसाय अधिक फायदेशीर व्हावा, शेतकऱ्यांची जोखीम कमी व्हावी, तसेच आधुनिक कृषी तंत्राला प्रोत्साहन मिळणे, सरंक्षित सिंचन व्यवस्थेसाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना सुरू केली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्रात वाढ करणे, जलवापर कार्यक्षमतेत वाढ करणे, कुशल व अकुशल बेरोजगारांसाठी रोजगाराची संधी निर्माण करणे, असे या योजनेचे उद्दिष्ट होते़
शेतकरी वंचित : शासनाने सर्वच पिकांकरिता ही योजना सुरू केल्यामुळे योजनेंतर्गत आपली ई-नोंदणी व्हावी, यासाठी अनेक शेतकऱ्यांनी आठ दिवसांपासून सातबारा, बँक पासबुकची सत्यप्रत घेऊन सायबर कॅफीकडे रिंघ लावली. मात्र सर्व्हर डाऊन असल्यामुळे या शेतकऱ्यांना घराकडे परतावे लागले़
एकीकडे दररोज सायबर कॅफीमागे चकरा मारल्याने आर्थिक नुकसान झाले, तर दुसरीकडे या योजनेची मुदत संपल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहेत़ जिल्ह्यातील २० हजार शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले असल्याची माहिती पुढे आली आहे़
पाच तालुक्यांना फटका
अवर्षणप्रवण क्षेत्रातील अल्प व अत्यल्प भूधारक ६० टक्के, अवर्षणप्रवण क्षेत्रातील सर्वसाधारण भूधारक ४५ टक्के, अवर्षणप्रवण क्षेत्राबाहेरील अल्प व अत्यल्प भूधारक ४५ टक्के, अवर्षणप्रवण क्षेत्राबाहेरील सर्वसाधारण भूधारक ३५ टक्के अशी अनुदानाची मर्यादा या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत होती़ अवर्षणप्रवण क्षेत्रात जिल्ह्यातील अमरावती, चिखलदरा, धामणगाव रेल्वे, वरूड, अंजनगाव सुर्जी या पाच तालुक्यांचा समावेश होता़ एक महिन्यात तब्बल १७ दिवस या तालुक्यातील सर्व्हर डाऊन राहत असल्याने मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे़
इतर जिल्ह्यांत वाढली मुदत
शासनाने ७ सप्टेंबर ते ६ आॅक्टोबर असे एक महिना राज्यात कृषी सिचंन योजना राबवून ई-अर्ज मागिविले होते़ गुरुवारी एक महिना पूर्ण झाल्यानंतर नागपूर, चंद्रपूर, रायगड, भंडारा या जिल्ह्यातील योजनेला मुदतवाढ दिली आहे़ मात्र त्यातून अमरावती जिल्हा वगळला असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे़
कृषी सिचंन योजनेअंतर्गत ई-अर्ज एक महिना मागविण्यात आले होते़ अनेक तालुक्यातील अर्ज या वेबसाईटवर प्राप्त झाले आहे़ गुरूवारपासून ई-अर्ज प्रक्रिया जिल्ह्यासाठी बंद करण्यात आली आहे़
- दत्तात्रय मुळे,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अमरावती
मागील आठ दिवसांपासून चकरा मारून आपली ई-नोंदणी झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा या योजनेची नोंदणी सुरू करून आम्हा शेतकऱ्यांना न्याय द्यावा़
- प्रवीण भोगे
शेतकरी, धामणगाव रेल्वे