तंत्रज्ञानाच्या युगात मुले होताहेत ‘एकलकोंडी’
By Admin | Updated: August 13, 2015 01:32 IST2015-08-13T01:32:10+5:302015-08-13T01:32:10+5:30
सध्याची लहान मुले अचाट आहेत, अफाट आहेत. स्मार्ट आहेत. पण स्मार्ट असणे म्हणजे काय?

तंत्रज्ञानाच्या युगात मुले होताहेत ‘एकलकोंडी’
भंडारा : सध्याची लहान मुले अचाट आहेत, अफाट आहेत. स्मार्ट आहेत. पण स्मार्ट असणे म्हणजे काय? पाचव्या, सहाव्या वर्षांपासून कॉम्प्युटर आणि मोबाईल सहजपणे हाताळणे, फाडफाड इंग्रजी बोलण, टीव्हीवरच्या डान्स किंवा कॉमेडी शो मध्ये भाग घेणे, अशीच स्मार्ट असण्याची परिभाषा आहे. मात्र स्मार्ट बनण्याच्या नादात मुले एकलकोंडी होत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.
स्मार्ट म्हणजे बुद्धिमान किंवा शहाणा नव्हे. हल्लीच्या परिभाषेत स्मार्ट असणे म्हणजे ‘चमको’ असणे. चारचौघात आपण इतरांपेक्षा उठून दिसणे. समाजात सहजपणे मिसळता येणे. कुणाशीही सहज बोलता येणे वैगरेवैगरे. हल्लीच्या १०-१२ वर्षांच्या मुलांना हे सगळ करता येते. इतकेच काय याच वयात ती मोठ्याप्रमाणे कपड्यांच्या आणि केसांच्या फॅशन्स करण्यातही तरबेज बनतात. त्यामुळे ती काही असामान्य बुद्धिमान किवा कर्तबगार ठरत नाहीत. त्यांच्या काळात उदार झालेल्या पालकांमुळे आणि समाजामुळे ते अमाप स्वातंत्र्य उपभोगत आहेत. त्यांच्यासाठी ज्ञान, माहिती आणि शिक्षण कमालिचे सोपे केले आहे. त्यांना ते सहज उपलब्ध होईल, अशी व्यवस्थाही आताच्या काळात आहे.
अभ्यासक्रमाच्या ज्ञानार्जनापेक्षा टक्केवारीच्या पद्धतीने स्वत:च डोके न चालवता त्यांना अव्वाच्यासव्वा गुण आणि पहिला वर्ग (फर्स्ट क्लास) सहजपणे मिळतो. उच्च शिक्षणाची संधीही त्यांना सहजपणे मिळते. मात्र एवढे सगळे मिळून या पिढीला दैनंदिन जीवनातले साधे-सोपे हिशेब, बेरीज आणि वजाबाकी तोंडी करता येत नाही. त्यासाठी कॅलक्युलेटरची मदत घ्यावी लागते. अर्थात त्यांनाच नाही. मोठमोठ्या डिपार्टमेंटल स्टोअर्स आणि मॉल यांच्या कॅश काऊंटरवर काम करणाऱ्या तरुण कर्मचाऱ्यांचही कॅलक्युलेटरविना चालत नाही. या पिढीच्या ‘स्मार्टनेस’ मधले हे मोठच उणे आहे. त्याचा सगळा आत्मविश्वास या टेक्नॉलॉजी आणि तिच्या पालकांनी चालवलेले बेसुमार लाड यांच्या खांबावर उभा आहे. त्याला स्वत: मिळविलेल्या ज्ञानाचा आणि कर्तबगारीचा पाया नाही. या मुलांचे पालक आज आयटी, कॉर्पोरेट किंवा मल्टीनॅशनल कंपन्यातून भरपूर पैसा मिळवतात. त्यामुळे आजच्या लहान मुलांना उच्च राहणीमान, लेटेस्ट टेक्नॉलाजी, भरपूर पॉकेटमनी आणि मनमुराद स्वातंत्र्याचा लहानपणापासून लाभ मिळतो. पालक, कोचिंग क्लासेस, इंटरनेट यांच्यामुळे सारे काही हाताशी असते. सारे काही त्यांना सहज मिळते. त्यामुळे त्यांच्यापाशी स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याची कुवत नसते. संघर्ष, अनुभव आणि परिश्रम यांच्याविना मिळालेल्या या सुखसोयीमुळे या पिढीला योग्य वयातही स्वत:चे निर्णय स्वत:ला देता येत नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे तिला अती जपले जात असल्यामुळे ती व्यवहार ज्ञानातही कच्ची राहतात.
मागील २५ ते ३० वर्षात देशात सर्वत्र वाढलेला दहशतवाद, खंडणीकरीता लहान मुलांचे अपहरण तसेच लैंगिक शोषण व अत्याचार या विकृतीमुळे आजच्या लहान मुलांच्या आयुष्यावर भितीच सावट आहे. चार-पाच वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि त्यानंतर हत्या असेही भीषण प्रकार सुरू आहेत. रेसिडेन्शियल स्कूलच्या होस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलांनाही लैंगिक अत्याचाराचा सामना करावा लागत आहे. मुलांना मिळणाऱ्या सुबत्तेला आणि स्वातंत्र्याला त्यामुळे ग्रहण लागले आहेत.
१0 वर्षांच्या मुलामुलींनाही संध्याकाळी जाऊन खेळणे किंवा सोसायटीच्या आसपास मोकळी जागा असल्यास तिथे एकत्र जमणे, गप्पा मारणे यासारख्या साध्या गोष्टीचा आनंद मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे संगणक, व्हिडिओ गेम्स, टीव्ही यांच्या आहारी गेलेल्या आणि सामाजिक जीवन हरवून बसलेल्या या पिढीला घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे सामान्य ज्ञान, व्यवहार ज्ञान, सामाजिक जीवन यांना आजची पिढी पारखी होत आहे. या साऱ्याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होत आहे. (प्रतिनिधी)