कोरोना नियमावलींचे पालन; विद्यार्थ्यांपुढे शिक्षकांची परीक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:28 IST2021-02-05T05:28:09+5:302021-02-05T05:28:09+5:30
पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा सवयी बदलल्या, दहा महिन्यानंतर अभ्यास, शिक्षण जाणवतेय कंटाळवाणे अमरावती : शालेय शिक्षण विभागाने २७ ...

कोरोना नियमावलींचे पालन; विद्यार्थ्यांपुढे शिक्षकांची परीक्षाच
पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा सवयी बदलल्या, दहा महिन्यानंतर अभ्यास, शिक्षण जाणवतेय कंटाळवाणे
अमरावती : शालेय शिक्षण विभागाने २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू केले. विद्यार्थी शाळेत अथवा वर्गात गर्दी करणार नाही, याची जबाबदारी शिक्षकांवर सोपविली आहे. आतापर्यत शाळा बंद असल्यामुळे घरी मौजमजा, धमाल होती. मात्र, आता शाळा सुरु झाल्यामुळे विद्यार्थ्याना काहीसे वेगळे जाणवत आहे. कोरोना नियमावलींचे पालन बंधनकारक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सवयी, गर्दी रोखण्यासाठी शिक्षकांची जणू परीक्षाच आहे.
मार्चपासून बंद असले्ल्या नववी ते बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू झाले. आता २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. गणित, विज्ञान आणि इंग्रजी विषयांचे अध्ययन वर्गात सुरू आहे. दोन विद्यार्थांमध्ये सहा फुटांचे अंतर बंधनकारक असले् तरी मुले संवगडी दिसताच एकत्र येण्याचा प्रयत्न करीत असल्याचे वास्तव आहे. वर्गात शिक्षकाची नजर चुकवून मित्रांजवळ येऊन गप्पा मारण्याचा मोह त्यांना आवरत नाही. मास्क वापर, सॅनिटायझर, थर्मल स्क्रिनिंग, ऑक्सिजन तपासणे आदी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी असलेल्या उपाययोजना विद्यार्थ्यांसाठी नवीन आहे. राष्ट्रगीत आटोपताच वर्गात प्रवेश दिला जातो. ना गप्पा, ना एकत्र जेवण हे सारे आता बंद झाले आहे. पुन्हा ते दिवस कधी परततील, अशी भावना बहुतांश विद्यार्थ्याची आहे. मात्र, कोरोना हद्दपार होईपर्यंत शाळांमध्ये विद्यार्थ्यांना हाताळताना शिक्षकांची परीक्षा नक्कीच आहे.
००००००००००००००००००००
एकूण शाळा-१४२७
विद्यार्थी उपस्थिती-४९,६०३
शिक्षक उपस्थिती- ५,३६२
०००००००००००००००००००
कोट
वर्गात विद्यार्थी मास्कनियमित वापरत आहे. गेल्या दहा महिन्यांपासून मुले घरीच होते. त्यामुळे शाळेची त्यांना ओढ होती. २७ जानेवारीपासून आतापर्यंत विद्यार्थ्यांचा कोणताही त्रास नाही. सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत मुले नियमितपणे वर्गात येत आहे. मास्कचा वापर, थर्मल स्क्रिनिंग होत आहे.
-वनिता जावरकर, शिक्षिका, जिल्हा परिषद शाळा, नांदुरा
-----------------
विद्यार्थी घरी असल्यामुळे शाळेच्या सवयी, अभ्यासक्रमाची गोडी हरपली आहे. आता नव्याने अध्यापन करावे लागत आहे. गर्दी रोखण्यासाठी थाेडीफार कसरत करावी लागते. कोरोना नियमावलींचे पालन करण्यासाठी शिक्षकांची परीक्षाच आहे. मुले अभ्यासात रमले पाहिजे यासाठी नियोजन सुरू आहे.
-प्रिती खोडे, शिक्षिका, एसआरपीएफ कॅम्प, महापालिका शाळा क्रमांक १५
--------------------
वर्गात तीनच विषयांची शिकवणी होत आहे. एकत्र जेवण किंवा क्रीडा, खेळांना मनाई आहे. पहिल्या दिवसांपासून कोरोना नियमावलींचे पालन करण्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. मास्कचा वापर, थर्मल स्क्रिनिंग नियमित हाेत आहे.
-रोशन देशमुख, शिक्षक, विलासनगर, महापालिका शाळा