६६ विनयभंग, २३ बलात्कार, १५ मुलींना पळविले
By Admin | Updated: December 15, 2015 00:23 IST2015-12-15T00:23:20+5:302015-12-15T00:23:20+5:30
घरातील पती, सासरे, दीर यांच्याकडून अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली आहे. ११ महिन्यांत आप्तेष्टांसोबतच प्रेमविरांनी घात केला आहे़ ...

६६ विनयभंग, २३ बलात्कार, १५ मुलींना पळविले
११ महिन्यांतील धक्कादायक वास्तव : महिलांसाठी असलेले कायदे थंडबस्त्यात
धामणगाव रेल्वे : घरातील पती, सासरे, दीर यांच्याकडून अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली आहे. ११ महिन्यांत आप्तेष्टांसोबतच प्रेमविरांनी घात केला आहे़ चांदूररेल्वे उपविभागात या कालावधीत ६६ विनयभंग, २३ बलात्कार व १५ मुलींना पळविल्याच्या घटना घडल्या आहेत़ जवळच्या नातेवाईकांकडून महिलांचे शोषण होत असल्यामुळे न्याय कुणाकडे मागावा, असा सवाल या अत्याचारग्रस्त महिलांनी उपस्थित केला आहे़
पुरूषांप्रमाणे महिलांना समान अधिकाराचे धोरण शासनाने आखले आहे़ मात्र याची अंमलबजावणी करण्याचे आदेशही प्रशासनाला दिले आहे़ परंतु जवळील नातेवाईकच महिलांचे शोषण करणार असेल तर न्यायासाठी कुणाच्या दारी जावे, असा प्रश्न निर्माण होत आहे़ चांदूररेल्वे उपविभागात सहा पोलीस ठाणे येतात. मागील ११ महिन्यांचा महिलांच्या अत्याचाराचा अहवाल घेतला असता आप्तेष्ट व प्रेमविरांकडून सर्वाधिक शोषण झाल्याची माहिती आहे़
धामणगाव तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर ठाण्याच्या हद्दीत जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत दहा विनयभंगाचे प्रकरण घडले आहे़ ४ महिलांवर बलात्कार व दोंघींना पळवून नेले आहेत़दत्तापूर पोलीस ठाण्याच्या परिसरात तब्बल नऊ विनयभंगाचे प्रकरण ११ महिन्यांच्या कालावधीत घडले आहेत़ एकींना पळवून नेले, दोन महिलेवर बलात्कार झाल्याची नोंद आहे़़ तळेगाव दशासर पोलीस ठाण्याच्या परिसरात आठ विनयभंगाच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे़ चार महिलांवर बलात्कार तर एकींना पळवून नेले आहे़
चांदूररेल्वेत महिलांवर
अधिक अत्याचार
चांदूररेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल २१ प्रकरण विनयभंगाचे घडले आहे़ सहा जणांना पळवून नेण्यात आले आहे. पाच महिलांवर अतिप्रसंग झाला आहे़ प्रेम प्रकरणातून अन्याय करण्यात आल्याची बाब पोलीस तपासात पुढे आली आहे़
तिवसा तालुक्यातील कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार अतीप्रसंग, तब्बल दहा विनयभंगाचे प्रकरण घडले आहे़ चार पळवून नेल्याची पोलीस ठाण्यात नोंद आहे. तिवसा पोलीस ठाण्याच्या परिसरात एका नवविवाहित महिलेने आत्महत्या केली, तर सावत्र बापानेच आपल्या मुलीवर अतिप्रसंग केला चार बलात्कार, पाच पळवून नेणे तर आठ विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे़
मागील अकरा महिन्यांत महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले आहे़ विनयभंग, अतिप्रसंग, मानसिक व शारीरिक छळ करणे हे प्रकार घडले आहे़ 'क्रिमिनल लॉ अमेडमेन्ट अॅक्ट'नुसार आता महिलांना पोलीस ठाण्यात न जाता कोठेही जबाब देता येतो़ परंतु जवळच्या नातेवाईकांचे वाढणारे दडपण अत्याचारित महिलांना पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचू देत नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे़ प्रेम प्रकरणाने तरूणीवर बलात्काराचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडले आहे़ एकीकडे महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत पन्नास टक्के जागांचे आरक्षण ठेवले आहे़ दुसरीकडे आप्तस्वकीयांकडून होणाऱ्या अन्यायामुळे अत्याचारित महिलांना दाद मागणे अवघड होत आहेत़ (तालुका प्रतिनिधी)
महिलांवर होत असलेल्या अत्याचारांबाबत पोलीस अनेक उपक्रम राबवीत आहेत़ मुलींची छेडछाड होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन नेहमी सतर्क राहते़ पोलीस ठाण्यात कौटुंबिक सल्लाकेंद्र सुरू करण्यात आले आहे़ महिलांना कौटुंबिक वादाबाबत मार्गदर्शन समुपदेशन करण्यासाठी महिला सहाय्यता केंद्र आहे़ त्यामुळे महिलांनी धाडसी बनवून तक्रार देण्यास पुढे येण्याची गरज आहे़
- राजाराम सामी,
पोलीस उपविभागीय अधिकारी, चांदूररेल्वे.