६६ ग्रामपंचायतींना २ फेब्रुवारीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:24 IST2021-02-05T05:24:04+5:302021-02-05T05:24:04+5:30
सरपंच आरक्षण सोडत : ५० टक्के पदे महिलांसाठी आरक्षित चांदूरबाजार : जिल्हाधिकाऱ्यांच्या २८ जानेवारीच्या आदेशानुसार तालुक्यातील ६६ ...

६६ ग्रामपंचायतींना २ फेब्रुवारीची प्रतीक्षा
सरपंच आरक्षण सोडत : ५० टक्के पदे महिलांसाठी आरक्षित
चांदूरबाजार : जिल्हाधिकाऱ्यांच्या २८ जानेवारीच्या आदेशानुसार तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण २ फेब्रुवारी रोजी काढण्यात येणार आहे. आरक्षण सोडत निवडणूक नियंत्रण अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांच्या समक्ष काढण्यात येणार आहे. ही आरक्षण सोडत प्रक्रिया तहसील कार्यालयात सकाळी ११ वाजता सुरू होईल. ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होऊन १८ जानेवारी रोजी मतमोजणी झाली. नवनिर्वाचित सदस्यांचे नावे निश्चित झाली. या सदस्यांना आता सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीची प्रतीक्षा आहे.
सरपंचपदासाठीचे हे आरक्षण सन २०२१ ते २०२५ या कालावधीसाठी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना लागू असेल. यामध्ये नुकत्याच निवडणूक झालेल्या ४१ ग्रामपंचायतींचा तसेच निवडणूक होणाऱ्या उर्वरित २५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. याआधी मार्च २०२० मध्ये होणारी निवडणूक रद्द करण्यात आली होती; परंतु हीच निवडणूक जानेवारी २०२१ मध्ये नव्याने घेण्यात आली. त्यामुळे याआधी काढण्यात आलेले तालुक्यातील सरपंचपदाचे आरक्षण रद्द करण्यात आले होते. हेच आरक्षण पुन्हा नव्याने काढण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार २ फेब्रुवारीला तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडत काढण्यात येत आहे. सरपंचपदाच्या आरक्षणात ५० टक्के पदे महिलांसाठी आरक्षित असतील. यात खुल्या व सर्व आरक्षित सरपंचपदाचा समावेश असेल. तसेच २०२० च्या रद्द झालेल्या निवडणुकीआधी सरपंचपदासाठी आरक्षण काढण्यात आले होते. या आरक्षणातील अनुसूचित जाती व जमातीचे आरक्षण जैसे थे राहणार आहे. राज्याच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या निर्देशानुसार २०२१-२०२५ या कालावधीसाठी अनुसूचित जाती व जमातीचे २०२० मध्ये काढलेले आरक्षण कायम राहणार आहे. यात कोणताही बदल करण्यात येणार नाही. या आरक्षणात तालुक्यातील एकूण २३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यातील १६ ग्रामपंचायती अनुसूचित जातीसाठी, तर ७ ग्रामपंचायती अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहेत.
अशी असेल शक्यता
शासन आदेशानुसार तालुक्यातील उर्वरित ४३ ग्रामपंचायतींचे निर्धारित कालावधीसाठी सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात येणार आहे. या ग्रामपंचायतींमधून नामाप्र व खुल्या प्रवर्गातील आरक्षण सोडतीव्दारे काढण्यात येणार आहे. या ४३ ग्रामपंचायतींमधील १८ सरपंचपद हे नामाप्रसाठी आरक्षित राहणार असून, २५ सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी असतील. अनुसूचित जाती व जमातीचे मागचेच आरक्षण कायम राहणार असल्यामुळे इतर आरक्षणातही जैसे थे स्थिती राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. नामाप्र व खुल्या प्रवर्गातील आरक्षण दोन -चार जागांसाठी इकडे तिकडे होऊ शकते. तर काहीअंशी यातील महिला व पुरुष आरक्षणात बदल घडून येऊ शकतो. आरक्षण सोडतीप्रसंगी तालुका निवडणूक अधिकारी धीरज स्थुल व सहायक निवडणूक अधिकारी अर्जुन वांदे उपस्थित राहतील.