पांढुर्णा गोटमार यात्रेत ६४२ जखमी
By Admin | Updated: September 6, 2016 00:16 IST2016-09-06T00:16:54+5:302016-09-06T00:16:54+5:30
मध्यप्रदेशातील पांढुर्णा येथे शेकडो वर्षांपासून पोळ्याच्या करीला जांब नदीच्या पात्रात गोटमार यात्रा भरते.

पांढुर्णा गोटमार यात्रेत ६४२ जखमी
पोळ्याच्या करीची परंपरा : १२ वर्षांत ७० जणांनी गमावले प्राण
संजय खासबागे वरूड
मध्यप्रदेशातील पांढुर्णा येथे शेकडो वर्षांपासून पोळ्याच्या करीला जांब नदीच्या पात्रात गोटमार यात्रा भरते. पांढुर्णा आणि सावरगावचे नागरिक प्रेम कहाणीच्या दंतकथेच्या आधारे ही पारंपरिक गोटमार करतात. मध्यप्रदेश प्रशासनाने गोटमार यात्रा बंद करण्यासाठी केलेले प्रयत्न निष्फळ ठरलेत. यावर्षी पोळ्याच्या करीला गोटमार यात्रेला सकाळपासूनच प्रारंभ झाला. यामध्ये ६४२ नागरिक जखमी तर दोन गंभीर झालेत. त्यांना नागपूरला हलविण्यात आले. मागील ७० वर्षांत या यात्रेत १२ लोकांनी प्राण गमावले आहेत. तरीही ही कुप्रथा सुरूच आहे.
वरुडपासून मध्यप्रदेशातील ३५ कि.मी. अंतरावरील पांढूर्णा येथे शेकडो वर्षांपासून पोळ्याच्या करीला जांब नदीच्या पात्रात गोटमार यात्रा भरते. ही यात्रा ३०० वर्षांपूर्वीच्या आख्यायिकेवर आधारित आहे. मात्र आजही ही परंपरा जोपासली जाते. सावरगाव आणि पांढुर्णा येथील प्रेमीयुगुलाच्या विवाहसंबंधाची ही दंतकथा आहे. पांढुर्ण्यातील युवक सावरगावच्या तरूणीला विवाह करण्याकरिता पांढुर्ण्याला नेत असताना दोन्ही गावातील लोकांमध्ये झालेल्या विरोधात नवदाम्पत्याचा जांब नदीतच मृत्यू झाला. अखेर दोघांनाही चंडीमातेच्या मंदिरात समाधी देण्यात आली. तेव्हापासून येथे यांच्या स्मृतीचे प्रतीक म्हणून ही यात्रा भरते.
यात्रेला सुरूवात होण्यापूर्वी भाविक सूर्योदयापूर्वी जांब नदीच्या पात्रात पळसाचे भले मोठे वृक्ष लावून त्यावर झेंडा लावतात. माध्यान्हानंतर या यात्रेला चांगली रंगत चढते. विदर्भासह मध्यप्रदेशातील काना कोपऱ्यातून गोटमार यात्रा पाहण्यास भाविकांची गर्दी होेते. अखेर दोन्ही गावातील नागरिकांच्या तडजोडीने सूर्यास्तानंतर झेंडा चंडीदेवीच्या मंदिरात आणून विधीवत पूजा केली जाते. केवळ धार्मिकतेच्या नावाखाली शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या या अघोरी प्रथेमध्ये दरवर्षी शेकडो नागरिक नाहक जखमी होतात. अनेकांना अपंगत्व येते, तर शेकडो प्राणसुद्धा गमवावे लागले. तरीदेखील ही कुप्रथा आजतागायत सुरूच आहे.
ही अघोरी यात्रा बंद करण्याकरिता प्रशासनाने अनेक वेळा दोन्ही गावांतील नागरिकांची समजूत काढली. तसेच चार वर्षांपूर्वी गोट्यांऐवजी रबरी बॉलसुद्धा दिले तरीसुध्दा प्रशासनाला न जुमानता गोटमार यात्रा अव्याहतपणे सुरूच आहे. गोटमारीकरिता दगडांचा खच लावला जातो. येथे दगड आणण्यास प्रशासनाने मज्जाव केल्याने भाविक आणि पोलिसांत तणाव झाला होता. प्रशासनाच्यावतीने जखमींवर उपचाराकरिता येथे कॅम्प लावण्यात येतो. तर शेकडो रूग्णवाहिकांचा ताफा तैनात असतो. हजारो पोलीस आणि जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित असतात. ही प्राचीन गोटमार यात्रा पाहण्याकरिता विदर्भासह मध्यप्रदेशातील खेड्यापाड्यांतून हजारो भाविकांची येथे गर्दी राहते. यावर्षी गोटमार यात्रेमध्ये दगडफेकीच्या धुमश्चक्रीत ६४२ भाविक जखमी झालेत, तर रमेश वघाळे (रा.पांढुर्णा) आणि विठ्ठल अजमिरे (सावरगाव) हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना नागपूरला हलविण्यात आल्याचे आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आले.
प्रशासनाचे
प्रयत्न निष्फळ !
प्रशासनाने अनेकवेळा ही प्रथा बंद करण्याकरिता दोन्ही गावांतील नागरिकांची समजूत काढली. चार वर्षांपूर्वी गोट्यांऐवजी रबरी बॉलसुद्धा दिले. मात्र प्रशासनाला न जुमानता ही गोटमार यात्रा अव्याहतपणे सुरुच आहे. गोटमारीकरिता दगडांचा खच लावला जातो.
७० वर्षांत
१२ जणांचा मृत्यू
येथील गोटामार यात्रेमध्ये गोटमारीत ७० वर्षांच्या काळखंडात १२ निष्पाप लोकांचे प्राण गेले. यामध्ये सन १९५५ मध्ये स्व.महोदव सांबारे, १९७८ मध्ये स्व. देवराव सकर्डे, १९७९ मध्ये स्व.लक्ष्मण तायवाडे, १९८७ मध्ये स्व. कोठीराम सांबारे, १९८९ मध्ये स्व. विठ्ठल तायवाडे, स्व.योगिराज चवरे, स्व.गोपाल चन्ने, स्व. सुधाकर हापसे, २००४ मध्ये रवि गायकी, २००५ मध्ये जनार्दन सांबारे, २००८ मध्ये गजानन घुग्गुसकर, २०११ मध्ये स्व. देवानंद वघाळे यांचा समावेश आहे.