३५४ गावांत प्रकाशाच्या वाटा खडतर !
By Admin | Updated: September 30, 2015 00:22 IST2015-09-30T00:22:40+5:302015-09-30T00:22:40+5:30
एकीकडे सिंचनाचा अनुशेष वाढत असताना महावितरणने जिल्ह्यातील वीज जोडणीतही अनुशेष कायम ठेवला आहे

३५४ गावांत प्रकाशाच्या वाटा खडतर !
तांत्रिकतेत अडकल्या वीज जोडण्या :
लोकमत विशेष
प्रदीप भाकरे अमरावती
एकीकडे सिंचनाचा अनुशेष वाढत असताना महावितरणने जिल्ह्यातील वीज जोडणीतही अनुशेष कायम ठेवला आहे. संपूर्ण संगणकीकरण आणि ‘डिजिटल व्हिलेज’ची संकल्पना आकाराला येत असताना जिल्ह्यातील ३५४ गावांत अद्यापही प्रकाश पोहोचलेला नाही. कधी वनविभागाच्या जाचक अटींमुळे तर कधी अन्य तांत्रिक कारणांमुळे या गावांच्या ‘प्रकाशवाटा’ खडतर बनल्या आहेत. अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या सन २०११ च्या आकडेवारीनुसार १९९७ गावे आहेत. यात ४१५ स्वतंत्र ग्रामपंचायती व ४२८ गावे आहेत. यात ४१५ स्वतंत्र ग्रामपंचायती व ४२८ गट ग्रामपंचायती आहेत. १९९७ पैकी १६४३ गावांमध्ये वीजजोडणी पोहोचली आहे. ही आकडेवारी सन २०१३
-१४ ची असून यंदा त्यात काही अंशी सुधारणा झाली असावी. मात्र, तब्बल ३५४ गावांचे विद्युतीकरण न झाल्याने या गावातील लोक अद्यापही संगणक आणि इलेक्ट्रॉनिक वस्तुंपासून कोसो दूर आहेत. विद्युतीकरण नसल्याने सिंचनासाठी आवश्यक व्यवस्था कार्यान्वित झाली नाही. मोटरपंप चालविण्यासाठी वीजच नसल्याने येथील शेतकरी प्रगत आणि उपयोगी व्यवस्थेपासून अजूनही लांब आहेत.
आकडेवारी खरी कुणाची ?
अर्थ व सांख्यिकी संचालनालयाद्वारे प्रसिध्द जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचनामध्ये प्रकाशित आकडेवारीवरुन जिल्ह्यातील ३५४ गावांत विद्युतीकरण झाले नाही, हे स्पष्ट होते. मात्र, महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी ही बाब नाकारली आहे. मेळघाटातील ३९ गावांमध्येच फक्त पारंपरिक वीज पोहोचलेली नाही, अशी माहिती महावितरणने दिली आहे. मेळघाटातील ३९ गावे वगळता जिल्ह्यातील उर्वरित गावात वीज पोहोचल्याचा दावा महावितरणकडून होत आहे. अशा स्थितीत ‘अर्थ व सांख्यिकी’च्या माहितीवर विश्वास ठेवावा की महावितरणचा दावा खरा म्हणावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अर्थ, सांख्यिकी संचालनालयाने विद्युतीकरण न केलेल्या गावांबाबत प्रकाशित केलेली माहिती सुसंगत नाही. मेळघाटातील ३९ गावे वगळता संपूर्ण जिल्ह्यात वीज पोहोचली आहे. शहरामध्ये अनेक छोटी-छोटी गावे समाविष्ट आहेत. मात्र, येथील ग्राहकांना शहरातील ग्राहक म्हणून वीजपुरवठा दिला जातो. याशिवाय नांदगाव खंडेश्वर गावात ५ गावे आहेत. मात्र, आमच्या रेकॉर्डमध्ये नांदगाव खंडेश्वर या एकाच गावाची नोंद आहे. त्यामुळे हा आकडा फुगला आहे.
- दिलीप मोहोड,
कार्यकारी अभियंता, महावितरण.