वडाळी-चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रात ३० बिबट
By Admin | Updated: January 10, 2017 00:07 IST2017-01-10T00:07:00+5:302017-01-10T00:07:00+5:30
जैवविविधतेने परिपूर्ण असलेल्या वडाळी व चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रात तब्बल ३० बिबटांचे अस्तित्व असल्याचा दावा जीवनरक्षा बहुउद्देशीय संस्थेने सर्वेक्षणातून केला आहे.

वडाळी-चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रात ३० बिबट
जीवनरक्षा बहुउद्देशीय संस्थेचे सर्वेक्षण : अभयारण्याचा प्रस्ताव रखडला
वैभव बाबरेकर अमरावती
जैवविविधतेने परिपूर्ण असलेल्या वडाळी व चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रात तब्बल ३० बिबटांचे अस्तित्व असल्याचा दावा जीवनरक्षा बहुउद्देशीय संस्थेने सर्वेक्षणातून केला आहे. शहरालगतच्या समृद्ध जंगलात वाघासह विविध वन्यप्राण्यांचा अधिवास असतानाही अभयारण्याचा प्रस्ताव शासनाकडे रखडला आहे.
शहरालगतचे वडाळी व चांदूररेल्वे वनपरिक्षेत्र २१ हजार ४८५ हेक्टरमध्ये पसरले आहे. इतक्या विस्तिर्ण जंगलात वन्यप्राण्यांच्या विविध प्रजाती, पक्षी व वनस्पती आहेत. जैवविविधतेने परिपूर्ण या जंगलात वाघाचे अस्तित्वही सिद्ध झाले आहे. या जंगलाचे संवर्धन व वन्यप्राण्यांच्या सुरक्षेच्या उद्देशाने जीवनरक्षा बहुउद्देशीय संस्था सातत्याने कार्यरत आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सन २०१५-१६ मध्ये रात्री १० ते पहाटेपर्यंत वडाळी व चांदूररेल्वे वनपरिक्षेत्राचे सर्वेक्षण करून वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित करून वन्यप्राण्यांची मोजणी केली आहे. त्यामध्ये अतिशय धक्कादायक माहिती हाती लागली आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पोहरा, भानखेडा, मालखेड, रत्नापूर, बोडणा, रजनीशपुरम (इंदला), चिरोडी, पिपंळखुटा, भिवापूर, कारला,
वन्यप्राणी-मानव संघर्षाच्या घटना नाहीत
अमरावती : आमला, उतखेड, जेवड बिट, अंजनगाव बारी, मार्डी, माळेगाव व कुऱ्हा या जंगलात फिरून सर्वेक्षण केले. त्यात ३० बिबट ‘सायटिंग’ झाले. तशी नोंद संस्थेने सर्वेक्षण अहवालात केली असून तो अहवाल वनविभागाला पाठविला आहे. वडाळी व चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रात वन्य प्राण्यांसाठी पोषक वातावरण व त्यांना मुबलक खाद्यपदार्थ उपलब्ध होत असल्यामुळे याजंगलात वन्यप्राण्यांची संख्या वाढल्याचे संस्था पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. ही बाब वन्यप्रेमींसाठी आनंददायी ठरली असून नागरिकांनीही वन्यप्राण्यांची भीती न बाळगता जंगल व वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी पाऊल उचलणे आता गरजेचे झाले आहे. यावन्यप्राण्यांनी गावकऱ्यांची जनावरे फस्त केली आहेत. मात्र, मागील चार ते पाच वर्षांत वन्यप्राणी व मानवी संघर्षाच्या घटना घडल्या नसल्याचे मत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी वर्तविले आहे. (प्रतिनिधी)
जंगल वाचविण्याचे ध्येय
जीवनरक्षा बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी खासगी कामे करून जंगल वाचविण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. संस्थाध्यक्ष सागर मैदानकर, उपाध्यक्ष राम खरबडे, मिलिंद वानखडे, प्राजक्ता बहादेकर, समीर कावरे, योगेश दंडाळे, सागर फुटाणे आदी पदाधिकारी जंगल संर्वधन व वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी धडपड करीत आहेत.
अभयारण्याचा दर्जा केव्हा ?
जिल्ह्यातील मेळघाटचे जंगल हे जैवविविधतेने समृद्ध आहे. अमरावती शहरालगतचे जंगलही आता समृद्ध झाले आहे. त्यामुळे वाघ, बिबटांसह अन्य वन्यप्राण्यांची संख्या वाढली आहे. या समृद्ध जंगलाला अभयारण्याचा दर्जा मिळावा, यासाठी काही वर्षांपूर्वी वन्यप्रेमींनी शासनदरबारी प्रस्ताव सादर केला आहे. मात्र, अद्याप त्या प्रस्तावावर सकारात्मक पाऊल उचलले गेले नाही. तो प्रस्ताव शासनदरबारी रखडला आहे. त्यामुळे या जंगलाला अभयारण्याचा दर्जा केव्हा मिळणार, याची प्रतीक्षा वन्यप्रेंमींसह जिल्ह्यातील सामान्य नागरिकांनादेखील लागून राहिली आहे.
सुरक्षा शक्य
जंगलाच्या सुरक्षेसाठी वनविभाग सातत्याने काम करीत आहे. मात्र, यासाठी नागरिकांनीही पुढाकार घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी जंगलात जाणे टाळावे, शेतातील रस्ते स्वच्छ ठेवावेत, जेणे करून वन्यप्राणी लवकरच दृष्टीस पडू शकेल, शेतात काम करताना सावध राहावे, घंटा जवळ बाळगून आवाज करावा. उघड्यावर शौचास न बसता शौचालयाचा उपयोग करावा. जंगल मार्गाने दुचाकीने ये-जा प्रवास करण्याचे टाळावे.
वनविभागामार्फत झालेल्या सर्वेक्षणात चांदूररेल्वे व वडाळीच्या जंगलात १६ बिबटांची नोंद मे २०१६ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात घेण्यात आली. त्या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाविषयी मला काही सांगता येणार नाही.
- हेमंतकुमार मीना,
उपवनसरंक्षक, अमरावती वनविभाग.