यंदाच्या नैसर्गिक आपत्ती नुकसानीसाठी २९ कोटींची मदत
By Admin | Updated: September 25, 2016 00:28 IST2016-09-25T00:28:25+5:302016-09-25T00:28:25+5:30
यंदा फेब्रुवारी व मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीटमुळे जिल्ह्यातील ३४ हजार ९२५ शेतकऱ्यांच्या १८ हजार ६५४ हेक्टर शेतामधील पिके बाधित झाली

यंदाच्या नैसर्गिक आपत्ती नुकसानीसाठी २९ कोटींची मदत
फेब्रुवारी-मार्चमधील गारपीट : ३४,९२५ शेतकऱ्यांना लाभ
अमरावती : यंदा फेब्रुवारी व मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीटमुळे जिल्ह्यातील ३४ हजार ९२५ शेतकऱ्यांच्या १८ हजार ६५४ हेक्टर शेतामधील पिके बाधित झाली. या सर्व एनडीआरएफच्या नव्या निकषाप्रमाणे मदत देण्यात येणार आहे. यासाठी शासनाने २९ कोटी ९ लाख ५२ हजाराचा निधी मंजूर केला आहे.
जिल्ह्यात यंदा फेब्रुवारी व मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीटमुळे गहू, हरभरा व संत्रा पीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कृषी व महसूल विभागाद्वारा सर्वेक्षण करण्यात आले. मात्र शासनाने बाधित शेतकऱ्यांना भरपाई न दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. आता शासनाने २० सप्टेंबर रोजी राज्यासाठी ८७ कोटी ५८ लाख ९१ हजाराचा निधी मंजूर केला. यामध्ये जिल्ह्याच्या वाट्याला २९ कोटी ९ लाख ५२ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. प्रचलित नियमानुसार नुकसानीकरिता मदत ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांसाठी राहणार आहे.
या बाधित क्षेत्राच्या पंचनाम्यासोबत पिकांचे छायाचित्र आवश्यक आहे. व या शासन मदतीची रकम शेतकऱ्यांच्या बॅँक खात्यावर जमा करतांना कोणतीही थकीत वसुली बॅँकांनी करु नये, असे निर्देश देण्यात आले आहे.
कोरडवाहू क्षेत्रासाठी ही मदत ६८०० रुपये प्रति हेक्टर आणि आश्वासित सिंचन योजनेखालील पिंकासाठी १३००० रुपये प्रतिहेक्टर अशी राहणार आहे. तसेच बहुवार्षिक पिकांसाठी १८,००० रुपये प्रतिहेक्टर प्रमाणे मदत मिळणार आहे. शासनाने याबाबत जीआर काढला आहे. (प्रतिनिधी)