शहराच्या पाणीपुरवठ्यात २५ दशलक्ष लिटरची वाढ

By Admin | Updated: May 13, 2015 00:33 IST2015-05-13T00:33:54+5:302015-05-13T00:33:54+5:30

शहरात साधारणत: ९५ दशलक्ष लिटरचा पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र, उन्हाळ्याच्या दृष्टीने आता दररोज १२० दशलक्ष लिटरचा पाणीपुरवठा केला जात आहे.

25 million liters increase in city water supply | शहराच्या पाणीपुरवठ्यात २५ दशलक्ष लिटरची वाढ

शहराच्या पाणीपुरवठ्यात २५ दशलक्ष लिटरची वाढ

वैभव बाबरेकर अमरावती
अमरावती : शहरात साधारणत: ९५ दशलक्ष लिटरचा पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र, उन्हाळ्याच्या दृष्टीने आता दररोज १२० दशलक्ष लिटरचा पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्याची मागणी वाढल्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठ्यात २५ दशलक्ष लिटरने वाढ करण्यात आली आहे.
मोर्शीजवळील सिंभोरा धरणावरून अमरावतीच्या जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पाईन लाईनद्वारे पाणीपुरवठा करण्यात येते. त्याकरिता सिभोंरा धरणावर २४ तास पाच पाण्याचे पंप सुरुच असतात. साधारणत: हिवाळा व पावसाळ्यात नागरिक पाण्याचा वापर कमी करतात. मात्र, उन्हाळ्यात नागरिकांना अधिक पाण्याची गरज भासते. उन्हाळ्यात उन्हाच्या दाहकतेने पाणी पिण्याचे प्रमाणही वाढते. तसेच थंड हवेसाठी घराघरात कुलरसुध्दा लागतात. त्यामुळे सर्वाधिक पाण्याचा वापर उन्हाळ्यात होत आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाणी पुरवठ्यात २५ दशलक्ष लिटरने वाढ केली आहे. जलशुध्दीकरण केंद्राची मर्यादा ९५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करावयाचे असतानाही मर्यादेपेक्षा अधिक १२० दशलक्ष लिटरचा पाणीपुरवठा शहराला केला जात आहे. उन्हाळ्यात नागरिक पाण्याचा अपव्यय अधिक प्रमाणात करतात. त्यातच पाणी गळतीचे प्रमाणही ३० टक्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये, या दृष्टीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाणीपुरवठ्यात वाढ केली आहे.
मजीप्राकडे ८० हजार ग्राहक
शहरात ८० हजार ग्राहकांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा करते. त्यामध्ये घरगुती नळ, सावर्जनिक नळ व कमर्शियल जोडणीधारक आहेत. हिवाळा व पावसाळ्यात नागरिकांना ८० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. मात्र, उन्हाळ्यात पाणी मागणी वाढत असल्यामुळे ८० हजार ग्राहकांनाच १२० दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासत आहे.
११ हजार ग्राहकांना अधिकृत पाणीपुरवठा
मजीप्राच्या सुवर्ण जंयती महोत्सवी वर्षा अतंर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी खासगी नळजोडणी योजना कार्यान्वित करणार आहे. त्याकरिता ११ हजार ग्राहकांना हक्काचे पाणी मिळणार आहे. पाणीपुरवठ्यात ३० टक्के गळती असून सर्वाधिक गळती मागासवस्तीत आहे. त्यातच सावर्जनिक नळावर पाण्याचा अपव्यय होत आहे. त्यादृष्टीने उपाययोजना म्हणून ही योजना राबविण्यात येत आहे. योजनेचा निधी महापालिकेकडे जमा झाला असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात निधी वळती करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहे. या योजनेत प्रत्येक नळ जोडणीधारकांसाठी शासन ४ हजार रुपये खर्चसुध्दा करणार आहेत.

Web Title: 25 million liters increase in city water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.