दोन वर्षांमध्ये २४९ आंतरजातीय विवाह
By Admin | Updated: July 23, 2015 00:14 IST2015-07-23T00:14:16+5:302015-07-23T00:14:16+5:30
समाजातील जातीयतेला काही प्रमाणात अंकुश लागावा, यासाठी आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याची शासनाची योजना आहे.

दोन वर्षांमध्ये २४९ आंतरजातीय विवाह
प्रोत्साहन : दाम्पत्यांना शासनाद्वारे देण्यात आले अनुदान
अमरावती : समाजातील जातीयतेला काही प्रमाणात अंकुश लागावा, यासाठी आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याची शासनाची योजना आहे. आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यांना या योजनेंतर्गत ५० हजार रुपये अनुदान देण्यात येते. जिल्ह्यात मागील दोन वर्षात २४९ जोडप्यांची आंतरजातीय विवाह केले आहे.
शासनाच्या योजनेनुसार त्यांना १ कोटी रुपये एवढे अनुदान वितरित करण्यात आले. चालू आर्थिक वर्षात ११० आंतरजातीय जोडप्याने अनुदानासाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केले आहेत.
समाजात सवर्ण आणि मागासवर्गीय असा भेदाभेद असल्याने शासनाद्वारे आंतरजातीय विवाह करणाऱ्यांसाठी अनुदानाची योजना सुरू करण्यात आली. जातीय भेदाभेद नष्ट करण्यासाठी शासन स्तरावरुन मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. हे प्रमाण वाढविण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाद्वारे दरवर्षी आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांचा सन्मान करण्यात येऊन त्यांना प्रोत्साहन योजनेला लाभ देण्यात येतो. जिल्ह्यात १ फेब्रुवारी २०१० पूर्वी आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना १५ हजार रुपये प्रमाणे अनुदान देण्यात येत होते. यामध्ये दोन वर्षांपासून वाढ करण्यात आली आहे.
आता ही रक्कम ५० हजार रुपये करण्यात आली आहे. समाजातील जातीभेदाचा प्रकार नष्ट व्हावा, आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येत आहे. त्यानुसार मागील वर्षी जिल्हा परिषदेने अनुदानासाठी २४९ जोडप्यांचे प्रस्ताव मंजूर केले. त्यानुसार आंतरजातीय विवाहित जोडप्यांना जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत १ कोटी २० लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यांनी अनुदानासाठी त्यांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे सादर करायला हवे. योजनेपासून कोणतेही दाम्पत्य वंचित राहू नये, असा प्रयत्न आहे. त्यामुळे आंतरजातीय विवाह केलेल्यांनी या योजनेचा लाभ घ्यायला हवा.
-भाऊराव चव्हाण, समाज कल्याण अधिकारी