५५७ गावांत मनरेगाची २१८६ कामे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 05:02 IST2020-04-23T05:00:00+5:302020-04-23T05:02:03+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामाच्या ठिकाणी प्रत्येकाने मास्क वापरावे. सामाजिक अंतराचे पालन करावे. सॅनिटायझरचा वापर करावा. हात साबणाने स्वच्छ धुवून घ्यावे. सर्दी, ताप, खोकला अशी काही लक्षणे दिसत असतील, तर तात्काळ डॉक्टरकडे जावे. याबाबत दक्ष राहण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

५५७ गावांत मनरेगाची २१८६ कामे सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागात रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात ५५७ गावांमध्ये २ हजार १८६ कामे राबविण्यात येत आहेत. रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने अधिकाधिक कामे सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी बुधवारी दिले.
जिल्ह्यात या नियोजनानुसार सद्यस्थितीत १७ हजार ७६ मनुष्यबळ रोजगारनिर्मिती होत आहे. मेळघाटात प्राधान्याने अधिकाधिक कामे राबविण्यात यावीत व टंचाई निवारणाच्या कामांनाही प्राधान्य द्यावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. रोहयोत जलसंधारण, सिंचन विहिरी, पशूंसाठी गोठा बांधकाम, फलोत्पादन आदी वैयक्तिक स्वरूपाच्या कामांसोबतच शेतीला जोडणारे रस्ते, जलसंधारण, नाला सरळीकरण, सामूहिक विहिरी, वृक्षारोपणाची पूर्वतयारी तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे सुलभ होणार आहेत. गावनिहाय मंजूर कामांचे नियोजन करून प्रत्यक्ष कामे सुरू करण्याच्या सूचना जिल्हास्तरावर उपजिल्हाधिकारी (रोहयो) व उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
कामाच्या ठिकाणी ही खबरदारी आवश्यक
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामाच्या ठिकाणी प्रत्येकाने मास्क वापरावे. सामाजिक अंतराचे पालन करावे. सॅनिटायझरचा वापर करावा. हात साबणाने स्वच्छ धुवून घ्यावे. सर्दी, ताप, खोकला अशी काही लक्षणे दिसत असतील, तर तात्काळ डॉक्टरकडे जावे. याबाबत दक्ष राहण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
लॉकडाऊनमुळे अर्थचक्राला गती देण्याच्या उद्देशाने अंशत: उद्योग व्यवसायांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यांनी कटाक्षाने दक्षता, सूचनांचे पालन करावे व त्यांच्याकडून तसे पालन होत असल्याची वेळोवेळी खातरजमा यंत्रणांनी करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.