लसीकरणानंतर १९ जणांना कोरोनाचा संसर्ग; अमरावती आरोग्य यंत्रणेची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 13:43 IST2021-02-09T13:43:34+5:302021-02-09T13:43:55+5:30

Amravati News कोरोनाची लस घेतली, आता संसर्ग होणार नाही, अश्या अविर्भावात वावरणाऱ्यांना कोरोनाने चांगलाच झटका दिला आहे. अशा १९ हेल्थ केअर वर्करना या आठवड्यात कोरोनाचा संसर्ग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

19 people infected with corona after vaccination; Amravati Health System Information | लसीकरणानंतर १९ जणांना कोरोनाचा संसर्ग; अमरावती आरोग्य यंत्रणेची माहिती

लसीकरणानंतर १९ जणांना कोरोनाचा संसर्ग; अमरावती आरोग्य यंत्रणेची माहिती

ठळक मुद्देएक महिन्यानंतर वाढते रोगप्रतिकारशक्ती

गजानन मोहोड

 लोकमत न्यूज नेटवर्क 
अमरावती : कोरोनाची लस घेतली, आता संसर्ग होणार नाही, अश्या अविर्भावात वावरणाऱ्यांना कोरोनाने चांगलाच झटका दिला आहे. अशा १९ हेल्थ केअर वर्करना या आठवड्यात कोरोनाचा संसर्ग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोग्य यंत्रणाद्वारे याला दुजोरा देण्यात आला.

कोरोना संसर्गात अग्रभागी असलेल्या आरोग्य यंत्रणेतील सर्वांनाच सर्वप्रथम कोरोनाची लस देण्यात येत आहे. जिल्ह्यात ही प्रक्रिया १६ जानेवारीपासून सुरू झाली व आतापर्यंत १०,८७४ ‘हेल्थ केअर वर्कर’ना लस देण्यात आलेली आहे. १६,४६२ कर्मचाऱ्यांची पहिल्या टप्प्यातील लसीकरणाची प्रक्रिया जिल्ह्यातील २१ केंद्रावर सध्या सुरू आहे. यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बूथवर कोव्हॅक्सिन व उर्वरित २० बूथवर कोविशिल्ड ही लस दिली जात आहे.

याच सर्वांना पुन्हा महिनाभरानंतर लसीचा दुसरा डोज देण्यात येईल. शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार होण्यासाठी एक ते दीड महिन्यांचा अवधी लागतो व तोवर धोका कायम असतो. कोव्हॅक्सिनमध्ये डेड व्हायरस असल्यामुळे यापासून संसर्ग होत नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितले.

लसीकरणाबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये मात्र मोठी उत्सुकता आहे. त्याचसोबत अनेक प्रश्नही आहेत. मानवी चाचण्यांमधून या लसीची परिणामकारकता सिद्ध झाल्यानंतरच तिचा वापर सुरू झालेला आहे. मात्र, लस घेतली म्हणजे, कोरोना विरुद्ध कवचकुंडले प्राप्त झाली, असा याचा अर्थ नाही. प्रतिबंधित उपाययोजना व त्रिसूत्रीचा अवलंब करणे अनिवार्य असल्याचे सीएस निकम यांनी सांगितले.

अ‍ॅन्टिबॉडीज किती दिवस टिकणार?

कोरोना संसर्गापासून बचावासाठी लस घेतल्याने शरीरात प्रतिपिंडे (अ‍ॅन्टिबॉडी) तयार होतात. परंतु, त्या सहा महिने टिकणार की वर्षभर, याविषयी एकवाक्यता मात्र नाही. लसीची परिणामकारकता ७५ टक्के असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. गर्भवती, स्तनदा मातांना मात्र लस दिल्या जात नसल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

यांना झाला लसीकरणानंतर कोरोना संसर्ग

लसीकरण झाल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झालेल्यांमध्ये एक माजी आमदार, महापालिकेतील डॉक्टर, लॅब टेक्निशियन, जिल्हा परिषदेतील आरोग्य कर्मचारी, सुपर स्पेशालिटीमधील आरोग्य कर्मचारी, नर्सिंग होस्टेलमधील नर्स व अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

२१४ आरोग्य कर्मचाऱ्यांना रिअ‍ॅॅक्शन

कोरोनाची लस घेतल्यानंततर २१४ जणांना हलक्या स्वरूपाची रिअ‍ॅक्शन झाल्याच्या तक्रारी आहेत. काहींना उपचारार्थ दाखल करावे लागले होते. मात्र, आतापर्यंत झालेल्या १० हजारांवर लसीकरणाच्या तुलनेत रिअ‍ॅक्शनचे प्रमाण खूप कमी आहे. हातपाय दुखणे, ताप, घशात खवखव, छातीत धडधड, चक्कर येणे आदी लक्षणे दिसून आलेली आहेत.

या केंद्रावर लसीकरण

शहरात पीडीएमसी, आयुर्वेदिक कॉलेज, तखतमल कॉलेज, डेंटल कॉलेज, वसंत हॉल व जिल्हा सामान्य रुग्णालय, अच्युत महाराज हॉस्पिटल व जिल्हा ग्रामीणमध्ये अचलपूर, मोर्शी, धारणी व दर्यापूर उपजिल्हा रुग्णालय, तिवसा, चांदूर रेल्वे, धामणगाव, भातकुली, नांदगाव खंडेश्वर, चांदूर बाजार व अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालय तसेच वरूड व अंजनगाव बारी केंद्रावर लसीकरण सुरु आहे.

लसीकरणानंतरही काळजी महत्त्वाची

लसीकरणानंततरही शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार व्हायला एक ते दीड महिन्यांचा अवधी लागत असल्याने तोवर धोका कायम असतो. त्यामुळे चेहऱ्याला मास्क, हात वारंवार धुणे, फिजिकल डिस्टन्स या त्रिसूत्रीचा वापर करणे अनिवार्य आहे.

लस घेतली म्हणूून रिलॅक्स होऊ नये. रोगप्रतिकारशक्ती तयार व्हायला वेळ लागत असल्याने धोका कायम असतो. निष्काळजीपणामुळेच काही जणांना लसीकरणानंतर संसर्ग झालेला आहे.

- डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक

 

Web Title: 19 people infected with corona after vaccination; Amravati Health System Information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.