१७ तास फायरफायटिंग
By Admin | Updated: May 26, 2015 00:25 IST2015-05-26T00:25:30+5:302015-05-26T00:25:30+5:30
औषधी कंपनीच्या तळमजल्यातील १० हजार लिटर रसायनापर्यंत आग पोहोचली असती तर रसायनांच्या स्फोटामुळे ....

१७ तास फायरफायटिंग
६० लाख लिटर पाण्याचा मारा
१० हजार लिटर केमिकल बचावले
अमरावती : औषधी कंपनीच्या तळमजल्यातील १० हजार लिटर रसायनापर्यंत आग पोहोचली असती तर रसायनांच्या स्फोटामुळे संपूर्ण एमआयडीसी परिसर आगीच्या विळख्यात सापडले असते. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता रात्रभरात ६० लाख लिटर पाण्याचा मारा करुन आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला.
एमआयडीसी परिसरातील लॅक्साकेम आर्गनाईज कंपनीचे संचालक परेश राजा आहेत. कंपनीत दररोज औषधी तयार करण्याचे काम चालते. त्याकरिता २५ ते ३० मजूर कार्यरत आहेत. रविवारी रात्री कंपनीत शॉर्ट सर्किटमुळे अचानक भीषण आग लागल्याने मजुरांसह सर्वांनीच धावपळ सुरु केली होती.
रात्री ९.२० वाजता अग्निशमन विभागाला आगीची माहिती मिळताच तत्काळ पाण्याचे बंब घेऊन कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. मात्र, कंपनीतील रसायनाच्या साठ्यामुळे आगीने भीषण रुप धारण केले होते.
कंपनीतील रसायनांचा स्फोट होत असतानाही अग्निशमन विभागाने आग विझविण्याचे कार्य सुरुच ठेवले होते. आगीच्या लपटा तब्बल १५ ते ३० फूट उंचीपर्यंत हवेत पसरत होत्या. त्यातच रसायनाच्या भरलेल्या कॅनमुळे वांरवार स्फोटसुध्दा होत होते. त्यामुळे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना आग विझविताना मोठे परिश्रम घ्यावे लागले.
एका मजुराचे हात भाजले
कंपनीला भीषण आग लागल्याचे पाहून एका मजुराने तळमजल्याकडे जाणाऱ्या पाईप लाईनचा व्हॉल बंद केला. मात्र, व्हॉल आगीमुळे गरम झाल्याने मजुराचा हात भाजला. मजुराने जीवाची पर्वा न करता व्हॉल बंद केल्याने तळमजल्यापर्यंत आग पोहोचली नाही. हे विशेष.
भीषण आगीत स्फोट होत असतानाही कर्मचाऱ्यांनी धाडस दाखवून आगीवर नियंत्रण मिळविले. कंपनीच्या तळमजल्यापर्यंत आग पोहोचली असती तर १० हजार लिटरच्या रसायनाचा स्फोट होण्याचीसुध्दा शक्यता होती. हा स्फोट झाला असता तर संपूर्ण एमआयडीसी पसिरराला मोठा धोका निर्माण झाला असता.
- भरतसिंग चव्हाण, अधीक्षक.