शहानूर धरणातील पाण्याचा १५० किलोमीटरचा प्रवास
By Admin | Updated: August 4, 2015 00:03 IST2015-08-04T00:03:31+5:302015-08-04T00:03:31+5:30
शहानूर धरणातून १५० किलोमीटर लांब प्रवास करून २३५ गावांना ‘ग्रॅव्हिटी’च्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे.

शहानूर धरणातील पाण्याचा १५० किलोमीटरचा प्रवास
२३५ गावांना ग्रॅव्हिटीतून पाणीपुरवठा : खारपाणपट्ट्यात ५० हजार नळजोडणीधारक
वैभव बाबरेकर अमरावती
शहानूर धरणातून १५० किलोमीटर लांब प्रवास करून २३५ गावांना ‘ग्रॅव्हिटी’च्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत या पध्दतीचा वापर करून खारपाण पट्ट्यातील ५० हजार ग्राहकांना शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.
जिल्ह्यात मोठी पाच धरणे असून महाराष्ट्र जीवन प्राधीकरण तीन धरणांतून पाण्याची उचल करते. यातून जिल्ह्याभरातील बहुतांश नागरिकांची तहान शुध्द पाण्याने भागविली जाते. याचा सर्वाधिक लाभ खारपाण पट्ट्यातील नागरिकांना होत आहे. जीवन प्राधिकरण सिंभोरा धरणातील पाण्याची उचल करून शहरातील ८० हजार ग्राहकांना पाणीपुरवठा करीत आहे. सिंभोरा ते नेरपिंगळाईपर्यंत २३ किलोमीटर अंतरावर ‘गॅ्रव्हिटी’च्या (उताराच्या दिशेने) माध्यमातून पाणीपुरवठा होतो. शहानूर धरणातून खारपाणपट्टयातील २३५ गावांमध्ये ‘गॅ्रव्हिटी’च्या माध्यमातून पाणीपुरवठा होतो. शहानूर धरणातील पाणी अमरावतीनजीकच्या काही गावांपर्यंत पोहोचले आहे, हे विशेष. त्यात अंजनगाव,दर्यापूरचा समावेश आहे. शहानूरचे पाणी शुध्द करून खारपाणपट्ट्यातील २०० टाक्यांपर्यंत पोहोचविले जाते.
धरणाच्या पाण्यावर शेती फुलू शकते
जिल्ह्यात ५ मोठी धरणे असून त्यांचे पाणी कालव्याद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकते. दुष्काळग्रस्त स्थितीतही पिकांसाठी पाण्याचा उपयोग होऊ शकतो. शासनाने सिंचनासाठी शेततळी निर्माण केली आहेत. उन्हाळ्यात शेततळीदेखील कोरडी पडतात. अशावेळी पाण्याची नितांत गरज भासते. मात्र, या धरणातील पाण्याचा साठा वर्षभर पुरणारा असून कालव्याद्वारे धरणातील पाणी वापरून शेतीतील पिके घेता येतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.
सव्वा कोटींचा खर्च करून अमरावतीकरांना पाणीपुरवठा
सिभोंरा धरण जलसंपदा विभागाच्या नियंत्रणाखाली कार्य करीत असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला महिन्याकाठी १८ लाख रुपयांचे पाणी बिल चुकवावे लागत आहे. त्यातच पाणी पुरवठ्यासाठी पाण्याचे पाच पंप २४ तास चालू ठेवावे लागतात. त्यासाठी दरमहिन्याला विद्युत बिलासाठी ९० लाखांच्या जवळपास खर्च केला जात आहे.
जीवन प्राधिकरण जिल्ह्यातील तीन धरणामधून ग्राहकांना पाणी पुरवठा करीत आहे. दर महिन्याला कोट्यवधींचा खर्च करून नागरिकांना शुध्द पाणी पुरविण्याची जबाबदारी प्राधिकरण पेलत आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून पाण्याचा बचत करणे, आवश्यक आहे.
- प्रशांत भामरे,
कार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.