१२ गावांना सतर्कतेचा इशारा
By Admin | Updated: July 26, 2015 00:36 IST2015-07-26T00:36:16+5:302015-07-26T00:36:16+5:30
दोन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना शेती व पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या बगाजी सागर धरणात ७३़७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून शुक्रवारी रात्रीपासून या धरणाचे पाच दरवाजे उघडले आहेत.

१२ गावांना सतर्कतेचा इशारा
बागाजी सागरचे दरवाजे उघडले : ३३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग
धामणगाव रेल्वे : दोन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना शेती व पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या बगाजी सागर धरणात ७३़७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून शुक्रवारी रात्रीपासून या धरणाचे पाच दरवाजे उघडले आहेत. त्यातून ३३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे़ दरम्यान, धामणगाव तालुक्यातील १२ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे़
निम्न लोअर वर्धा अंतर्गत बगाजी सागर धरणाची मुहूर्तमेढ १९७६ मध्ये रोवण्यात आली. अमरावती जिल्ह्यातील सात व वर्धा जिल्ह्यातील २९ गावांचे पुनर्वसन करण्यात आले़ ३१ दरवाजे असलेल्या या धरणात २५३़१७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठ्याची क्षमता आहे़ सध्या या धरणात ७३़७ दलघनमीटर पाणी आहे़ गेल्या २४ तासांत या धरण क्षेत्रात ४० मि.मी. पाऊस कोसळला. मध्यप्रदेशात पडणाऱ्या पावसामुळे चार दिवसात २८ सें.मी.ने पाण्याची पातळी वाढली आहे़ शुक्रवारी रात्रीपासून या धरणाचे तीन दरवाजे उघडले होते़ त्यानंतर रात्री झालेल्या पावसानंतर पुन्हा दोन असे एकूण पाच दरवाजे उघडण्यात आलीत़ आगामी २४ तासांत या भागात संततधार पाऊस पडला आणि पाण्याची पातळी वाढली तर कोणत्याहीक्षणी धरणाचे अन्य दरवाजे उघडण्यात येतील, असे कार्यकारी अभियंता गावंडे यांनी सांगितले़ तालुक्यातील १२ गावे वर्धा नदी काठी असल्याने ग्रामस्थांनी सतर्कता बाळगावी, यासाठी दवंडी दिल्याचे तहसीलदार श्रीकांत घुगे यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)