११ लक्ष वसुलीचे आदेश
By Admin | Updated: June 28, 2015 00:33 IST2015-06-28T00:33:46+5:302015-06-28T00:33:46+5:30
तालुक्यातील ब्राह्मणवाडा (भगत) ते अंतोरा मार्गावरील रपटा दुरूस्तीचे जवळपास १६ लाख रूपयांचे बांधकाम चुकीच्या ...

११ लक्ष वसुलीचे आदेश
जिल्हा परिषद : अभियंता, कंत्राटदारांवर दोष सिद्ध
अमरावती : तालुक्यातील ब्राह्मणवाडा (भगत) ते अंतोरा मार्गावरील रपटा दुरूस्तीचे जवळपास १६ लाख रूपयांचे बांधकाम चुकीच्या पद्धतीने अंदाजपत्रक तयार करून कामातही अनियमितता केल्याप्रकरणी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग क्र. १ चे उपअभियंता, कनिष्ठ अभियंता आणि कंत्राटदारांकडून ११ लाख रूपयांच्या वसुलीची प्रक्रिया सुरु झाली आहे. हे आदेश ३० मे रोजी दिले होते, हे विशेष.
अमरावती तालुक्यातील ब्राम्हणवाडा भगत ते अंतोरा मार्गावरील रपटा सन २०१३- २०१४ मधील पूरहानी कार्यक्रमातून दुरुस्तीसाठी मंजूर केला होता. त्यानुसार या कामासाठी जिल्हा परिषदेच्या उपलब्ध निधीतून १६ लाख रूपये मंजूर करण्यात आले. हे काम मार्च २०१५ पर्यंत पूर्ण करणे अनिवार्य होते. त्यामुळे अत्यंत कमी कालावधीत या कामांचे नियोजन करताना चुकीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. काम सुरू करताना रपट्यालगतच्या भिंतीजवळ १० फूट खोदकाम चुकीचे पध्दतीने करण्यात आले. त्यामुळे ही भिंत कोसळली. त्यामुळे संप्तत गावकऱ्यांनी संबंधित कंत्राटदार व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पुढील काम करण्यास मज्जाव केला आहे.
जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांनी या कामाची पाहणी करण्याचे निर्देश कार्यकारी अभियंता बांधकाम यांना दिले होते. त्यानुसार या कामाचे मुल्याकंन दोन उपअभियंता यांनी करून सादर केलेल्या अहवाला नुसार सदर कामांचे अंदाजपत्रक चुकीच्या पद्धतीने केल्याचे निष्पन्न झाले. अशातच काम सुरू असतांनाच नदी पात्रावरील रपट्याची भिंत पडल्याने गावकऱ्यांचा ये -जा करण्याचा मार्गही बंद झाला असल्याने गावकऱ्यांनी या कामाला विरोध कायम ठेवला आहे. जेथ पर्यत पूर्ण काम नव्याने करणार नाही, तेथपर्यंत काम सुरू करू न देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. सध्या रपटा दुरुस्तीचे काम रखडले आहे. अशातच नुकत्याच पावसामुळे हा रपटा पूर्णत: वाहून गेल्याने सद्यस्थितीत अंतोरा गावकऱ्यांच्या दळणवळणाचा प्रश्न ऐरणीकर आला आहे. या प्रकरणी सीईओंनी दिलेल्या आदेशानुसार जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग क्र.१ चे उपअभियंता व्यवहारे यांच्यासह कनिष्ठ अभियंता शेंडे व संबंधित कंत्राटदाराकडून प्रत्येकी ३ लाख ७५ हजार रूपयांप्रमाणे ११ लाख रूपये वसूल करण्याचे आदेश दिले आहेत.
रपटा दुरूस्तीच्या कामादरम्यान नदीपात्रातील पाण्यामुळे याठिकाणी दलदल निर्माण होऊन भिंत पडली. त्यामुळे या कामाला गावकऱ्यांनी विरोेध केला व नव्याने काम करण्याची मागणी केली आहे. सध्या काम बंद आहे. गावकऱ्यांच्या तक्रारीवरुन बांधकाम विभागाचे दोषी उपअभियंता, कनिष्ठ अभियंता व कंत्राटदार यांच्याकडून ११ लाख रूपयांच्या वसुलीचे आदेश सीईओंनी दिले आहेत.
- गिरीश कराळे,
सभापती, बांधकाम समिती, जिल्हा परिषद अमरावती.