कृषी विकासासाठी १००० कोटी

By Admin | Updated: January 12, 2017 00:05 IST2017-01-12T00:05:01+5:302017-01-12T00:05:01+5:30

खारपाणपट्ट्यातील गावे लागवडीयोग्य करण्यासाठी व हवामान बदलास अनुसरुन कृषीपद्धती विकसित करण्यासाठी जिल्ह्यात १००० कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत.

1000 crore for agricultural development | कृषी विकासासाठी १००० कोटी

कृषी विकासासाठी १००० कोटी

अमरावती : खारपाणपट्ट्यातील गावे लागवडीयोग्य करण्यासाठी व हवामान बदलास अनुसरुन कृषीपद्धती विकसित करण्यासाठी जिल्ह्यात १००० कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत. पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या प्रयत्नातून कृषी संजीवनी योजनेंतर्गत हा निधी मिळणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची बैठक मुंबई येथील सह्याद्री वसतिगृहात बुधवारी पार पडली. यावेळी अमरावती जिल्ह्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. याप्रकल्पांतर्गत अमरावती विभागातील पाच जिल्हे, नागपूर विभागातील वर्धा तसेच मराठवाड्यातील आठ जिल्हे व जळगावचा योजनेत समावेश करण्यात आला आहे.

४ हजार कोटींचा प्रकल्प
अमरावती : प्रकल्पाकरिता जागतिक बँकेकडून २८०० कोटी मिळणार असून राज्य शासनाच्या १२०० कोटींच्या वाट्यासह एकूण ४००० कोटींचा निधी या प्रकल्पासाठी उपलब्ध होणार आहे. खारपाण पट्ट्यांतर्गत सर्वाधिक क्षेत्र असणाऱ्या अमरावती जिल्ह्यास १००० कोटी रूपये मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिली. याबैठकीला कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, कृषी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार आदी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांचे प्रयत्न, खारपाणपट्ट्यासाठी उपलब्धी
पाण्याच्या ताळेबंदाने होणार पिकांचे नियोजन
याप्रकल्पांतर्गत समूहपद्धतीने गावांची निवड करून शिवारातील पाण्याच्या ताळेबंदानुसार पीकनियोजन करण्यात येणार आहे. तसेच कृषी अवजारे विविध सुविधा केंद्राद्वारे लहान शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर पुरविण्यात येणार आहे व खारपाण पट्ट्यातील जमीन व्यवस्थेसाठी सर्व बाधित गावांचा समावेश करुन विशेष उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.

हवामान बदलास अनुसरून साधणार कृषीविकास
हवामान बदलास अनुसरुन कृषीपद्धती विकसित करणे, अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांचे कृषी उत्पादकतेमध्ये वृद्धी करणे व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषीमूल्य साखळीमध्ये त्यांचा सहभाग वाढविणे हा नानाजी देशमुख कृषी संजीवन प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

Web Title: 1000 crore for agricultural development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.