१ लाख ७२ हजार ४३० बालकांचे होणार पोलिओ लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:28 IST2021-02-05T05:28:36+5:302021-02-05T05:28:36+5:30
अमरावती : जिल्हाभरात रविवार, ३१ जानेवारी रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेद्वारे शून्य ते पाच या वयोगटातील प्रत्येक ...

१ लाख ७२ हजार ४३० बालकांचे होणार पोलिओ लसीकरण
अमरावती : जिल्हाभरात रविवार, ३१ जानेवारी रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेद्वारे शून्य ते पाच या वयोगटातील प्रत्येक मुलाला पोलिओचा डोस दिला जाणार आहे. १ लाख ७२ हजार ४३० बालकांचे लसीकरण यात होणार आहे. मोहिमेत बूथ ॲक्टिव्हिटीद्वारे ग्रामीण भागात १ लाख ३५ हजार ३५२, तर नागरी भागात ३७ हजार ७८ असे एकूण १ लाख ७२ हजार ४३० बालकांचे लसीकरण होणार आहे. ग्रामीण भागात १ हजार ७६३ व नागरी भागात २०० असे १९६३ बूथ असतील. त्याकरिता जिल्ह्यात ४ हजार ८३० स्वयंसेवकांचे मनुष्यबळ असेल. विविध सार्वजनिक उपक्रम राबवून लसीकरण मोहीम यशस्वी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. गावांमधील प्रत्येक नवजात शिशूची माहिती गोळा करण्याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्रांना सूचित करण्यात आले आहे. जिल्ह्यात १४ हजार ५४८ लसकुपी, १४२३ लस कॅरिअर, ५ हजार ५८८ आइसपॅक, नोंदीसाठी आवश्यक मार्कर पेन आदी सर्व साहित्य उपलब्ध झाल्याची माहिती आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली. अंगणवाडी, शाळा, बसस्थानक, रेल्वेस्थानक, टोलनाके, सर्व रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे येथे लसीकरण होणार आहे.
नुकतेच बाळ जन्मलेले असेल, यापूर्वी डोस दिला असेल तरीही द्यावा. बाळ आजारी असेल तर वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्याने डोस द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
------------------------
एकही बालक लसीकरणापासून सुटू नये -पालकमंत्री
जिल्ह्यातील सर्व बालकांना १०० टक्के लसीकरण झाले पाहिजे. महामार्गावरील रस्त्याच्या बाजूला वास्तव्यास असलेली घरे, धाबे, शेतातील लाभार्थी, पूल व इमारतीच्या बांधावर असलेल्या मजुरांची बालके, भटक्या लोकांची बालके, याशिवाय बाजाराच्या दिवशी येणारे बालके या सर्वांचे लसीकरण व्हावे. त्यासाठी मोबाइल पथकांनी सर्वदूर पोहोचून मोहीम यशस्वी करावी, असे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी यंत्रणांना दिले आहेत.
--------------------------------
शून्य ते पाच वयोगटातील बालकांचे लसीकरण करा
रविवारी होणाऱ्या पल्स पाेलिओ लसीकरण मोहिमेत शून्य ते पाच वयोगटातील बालकांचे लसीकरण करून घेण्यासाठी पालकांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले, माताबाल संगोपन अधिकारी विनोद करंजेकर यांनी केले आहे.
---------------------------------
राठी विद्यालयात अटल टिंकरिंग लॅबचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन
अमरावती : विद्यार्थ्यांमध्ये उपजत कुतूहल व संशोधनवृत्ती असते. तिची जोपासना होणे आवश्यक असते. राठी विद्यालयात विद्यार्थ्यांनी साकारलेले प्रकल्प पाहून त्यांच्यातील प्रज्ञा व संशोधनवृत्तीची जाणीव होते, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी नुकतेच येथे सांगितले.
श्री गणेशदास राठी विद्यालयात अटल टिंकरिंग लॅबचे उद्घाटन करताना जिल्हाधिकारी नवाल बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष वसंतकुमार मालपाणी, नंदकिशोर कलंत्री, जुगलकिशोर गट्टाणी, गोविंद लाहोटी आदी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांच्या तंत्रज्ञानाधारित प्रकल्पाचे जिल्हाधिकाऱ्यांनी अवलोकन व कौतुक केले. नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनमध्ये अटल टिंकरिंग लॅब या योजनेत अनेक शाळांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकसनासाठी ही योजना सुरू आहे. आधुनिक प्रयोगशाळेत इलेक्ट्रॉनिक पार्ट्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिकल, थ्रीडी प्रिंटर, ड्रोन, रोबोटिक्स किट्स आदी साधने उपलब्ध आहेत.
उपमुख्याध्यापिका मीना शर्मा, शैलेश सुताने, रवींद्र सारडा यांनी स्वागत केले. वृंदा मराठे यांनी सूत्रसंचालन केले.