अकोला: गत वर्षभरात कोविडच्या दोन लाटा येऊन गेल्या. त्याचा गंभीर परिणाम रक्त संकलनावर झाला. शाळा, महाविद्यालये बंद असल्याने रक्तदान शिबिरेही गरजेनुसार झाले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील मोठ्या रक्तपेढ्यांमध्ये तीन ते चार दिवस पुरेल येवढाच रक्तसाठा शिल्लक राहिल्याची स्थिती मागील वर्षभरापासून आहे. अशा संकटाच्या काळात ऑनकॉल रक्तदान करुन रक्तदात्यांनी अनेकांचे प्राण वाचविले. कोरोनामुळे नॉनकोविड वैद्यकीय उपचार प्रभावीत झाले होते. त्यामुळे अनेक शस्त्रक्रियाही पुढे ढकलण्यात आल्या, मात्र अपघातग्रस्तांसह थॅलेसिमिया, हिमोफिलिया या सारख्या आजाराच्या रुग्णांना नियमीत रक्ताची गरज भासते. परंतु, कोविडमुळे यंदा रक्तसंकलनात मोठ्या प्रमाणता घट झाली. त्याचा फटका या रुग्णांना बसला असून रक्तपेढ्यांमध्ये संकलीत रक्तही तीन ते चार दिवस पुरेल येवढेच उपलब्ध आहे. रक्तपेढ्यांमध्ये संकलीत रक्ताची उपलब्धता मर्यादीत असली, तरी ही कमी भरून काढण्यासाठी रक्तपेढ्यांनी ‘ऑनकॉल’ रक्तदानासाठी रक्तदात्यांना आव्हान करण्यास सुरुवात केली. त्यामुळे गंभीर रुग्णांनी गरज असेल, तेव्हाच रक्तदात्यांकडून रक्तसंकलीत करण्याचा प्रयत्न सुरू झाला. रक्तदात्यांनीही त्याला प्रतिसाद देत गरजू रुग्णांना रक्तदान करून त्यांचे प्राण वाचविले.
राज्यात दिवसाला पाच हजार रुग्णांना रक्ताची गरज
परिषदेच्या माहितीनुसार राज्यभरात दर दिवशी सुमारे ४५०० ते ५००० गंभीर रुग्णांना रक्ताची गरज भासते. यामध्ये प्रामुख्याने तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी, अपघातग्रस्तांसाठी व थॅलेसिमिया, हिमोफिलिया या रक्ताच्या आजाराने ग्रस्त रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी रक्ताची निकड भासते. अकोला शहरात येणाऱ्या अशा रुग्णांचे प्रमाणही अधिक आहे.
अशी आहे जिल्ह्याची स्थिती
मोठ्या रक्तपेढ्या - ५
रक्तसंकलन
२०२० मध्ये १९, ९९८ युनिट
२०२१ मध्ये ९,४६१ युनिट
व्हॉट्स ॲप ग्रुपची महत्त्वाची भूमीका
कोविडच्या संकटात रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी एका रक्तपेढीतून दुसऱ्या रक्तपेढीत भटकंती करावी लागली. अशा परिस्थितीत रक्तदात्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपनी महत्त्वाची भूमीका बजावली. व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून रुग्णाची संपूर्ण माहिती, त्याच्या नातेवाईकाचा संपर्क क्रमांक आणि त्याचा रक्तगट देताच रक्तदाते रुग्णाच्या नातेवाईकांशी थेट संपर्क साधून त्यांच्या रक्ताची गरज भागवत आहेत. या माध्यमातूनही अनेकांचे प्राण वाचविण्यात रक्तदात्यांची मोठी भूमीका राहीली आहे.
पाच हजार युनिटने घटले रक्तसंकलन
गत काही वर्षांपासून सर्वाधिक रक्तसंकलन करणारी रक्तपेढी म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तपेढी अव्वल स्थानी होती. ही रक्तपेढी वर्षाला १० हजारपेक्षा जास्त युनिट रक्तसंकलन करते, मात्र कोरोना काळात रक्तसंकलन प्रभावीत झाले. २०२० मध्ये केवळ ६ हजार युनिट रक्तसंकलीत करण्यात आले. तर जानेवारी २०२१ ते १३ जून २०२१ पर्यंत केवळ दोन हजार २२० युनिट संकलीत करण्यात आले. तसेच जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या रक्तपेढीत देखील सुमारे दोन हजार युनिट रक्तसंकलीत करण्यात आले.
मी आतापर्यंत ६५ वेळा रक्तदान केले, मात्र रक्तदान करताना रुग्णाच्या नातेवाईकांकडूनही रक्तदान करवून घेतले. अनेक जण आपल्या रुग्णासाठी रक्तदात्यांकडून रक्त संकलीत करतात, मात्र स्वत: रक्तदान करत नाही. अशा नातेवाईकांनीही रक्तदात्यासोबत रक्तदान करावे. जेणेकरून इतर गरजूंनाही रक्त पुरविण्यास मदत होईल.
- प्रभजितसिंग बच्छेर, सदस्य, रेडक्रॉस सोसायटी, अकोला
- कोरोनामुळे रक्तसंकलनाला मोठा फटका बसला आहे. रक्तदान शिबिरेही नेहमीच्या तुलनेत कमी झाले आहेत. कोरोना काळातही रक्तदान करणे सुरक्षीत आहे. रक्तपेढ्यांमार्फत आवश्यक सर्वच खबरदारी घेतली जाते. त्यामुळे रक्तदात्यांनी न घाबरता रक्तदानास पुढे यावे.
- डॉ. अजय जुनगरे, विभागप्रमुख, शासकीय रक्तपेढी, जीएमसी, अकोला