तरुणांच्या स्वप्नांना भरारी घेण्यासाठी हवे विस्तीर्ण आकाश!

By Admin | Updated: January 16, 2017 01:20 IST2017-01-16T01:20:56+5:302017-01-16T01:20:56+5:30

राज्यस्तरीय युवा मराठा साहित्य संमेलनाचे उद्घाटन; दुर्गेश सोनार यांचे प्रतिपादन.

Wishful sky to take the dreams of youth! | तरुणांच्या स्वप्नांना भरारी घेण्यासाठी हवे विस्तीर्ण आकाश!

तरुणांच्या स्वप्नांना भरारी घेण्यासाठी हवे विस्तीर्ण आकाश!

अकोला, दि. १५- सध्याचा काळ हा वेगवेगळय़ा प्रकारच्या संघर्षाचा काळ आहे. तरुणांच्या आशा-आकांक्षांच्या दृष्टीने तर हा काळ आव्हानात्मक आहे. भली-बुरी अशी कितीतरी आडवळणे सध्याच्या तरुण पिढीसमोर उभी आहेत. या आडवळणातूनच तरुणांना स्वत:ची वाट निर्माण करायची आहे. आजचा तरुण या आडवळणातून वाट निर्माण करू पाहतोय. त्याच्या स्वप्नांना भरारी घेण्यासाठी विस्तीर्ण आकाश हवे ; परंतु असे वातावरण सध्याच्या काळात खरेच आहे का, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आता आली आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक दुर्गेश सोनार यांनी रविवारी येथे केले.
सृष्टी बहुउद्देशीय युवा संस्थेच्यावतीने येथील ज्युबिली इंग्लिश हायस्कूलच्या लोकमान्य टिळक सभागृहात पहिले राज्यस्तरीय युवा मराठा साहित्य संमेलनाचे उद्घाटन रविवारी सकाळी करण्यात आले. यावेळी अध्यक्षीय भाषणातून दुर्गेश सोनार बोलत होते. कार्यक्रमाला मंचावर संमेलनाध्यक्ष म्हणून दुर्गेश सोनार, उद्घाटक डॉ. संतोष हुसे, सचिन काटे, उमेश मसने, स्वागताध्यक्ष अँड. पप्पू मोरवाल, दिनेश भालतिलक उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना दुर्गेश सोनार म्हणाले, की युवकांचे पहिले राज्यस्तरीय संमेलन अकोल्यात होत आहे, ही साहित्य इतिहासातील महत्त्वाची घटना आहे. अकोल्याच्या भूमीतून अनेक साहित्यिक जन्मले आहेत. राज्यभरात विविध प्रकारची साहित्य संमेलने सातत्याने होत असतात. काही संमेलने ही विशिष्ट विचाराभोवती केंद्रित झालेली असतात, तर काही संमेलने ही निव्वळ साहित्याचा उत्सव यापुरतीच र्मयादित असतात. या सगळय़ा साहित्यांच्या प्रवाहामध्ये युवकांच्या साहित्याला योग्य स्थान मिळत नाही. युवकांच्या साहित्याला व्यासपीठ मिळावे, यासाठी अकोल्यातून सुरू झालेले युवा साहित्य संमेलन ही चांगली सुरुवात आहे, असे गौरवोद्गार यावेळी सोनार यांनी काढले. यावेळी त्यांनी सोशल मीडियाचे युवा साहित्याशी असलेले नाते उलगडून सांगतानाच युवकांनी केवळ या माध्यमातच गुरफटून राहू नये, असा सल्लाही दिला. तरुणांनी लेखनातून संवादाचे पूल अधिक बळकट करावे, अशी अपेक्षा व्यक्त करताना, सोनार यांनी तरुणांना माणसांमध्ये मिसळून सामाजिक जाणिवांच्या कक्षा अधिकाधिक रुंदावण्याचे आवाहन केले.
उद्घाटन सोहळय़ात प्रा. संतोष हुसे, अँड. पप्पू मोरवाल, संदीप चव्हाण, दिनेश भालतिलक यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रवीण हटकर, संचालन पूजा काळे व गोपाल मापारी यांनी केले.

Web Title: Wishful sky to take the dreams of youth!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.