ही कसली आझादी, ही तर गुलामगिरीच.. सर्वच उठले शेतक-यांच्या जीवावर!
By Admin | Updated: May 25, 2015 02:20 IST2015-05-25T02:20:02+5:302015-05-25T02:20:02+5:30
शेतकरी आत्महत्या प्रकरण; आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठी व्यक्त केल्या भावना.

ही कसली आझादी, ही तर गुलामगिरीच.. सर्वच उठले शेतक-यांच्या जीवावर!
हिवरखेड/तेल्हारा : सततची नापिकी.. बोअरवेलसाठी बॅँकेकडून कर्ज घेतले..विद्युत जोडणीसाठी अर्ज केला.. मात्र पैशांची मागणी केली गेली.. महावितरण, व्यापारी सर्वच जण शेतकर्यांच्या जीवावर उठले.. ही कसली आझादी.. ही तर गुलामगिरीच.. अशा शब्दात आत्महत्या करण्यापूर्वी विनोद रामदास खारोडेने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. विद्युत जोडणी मिळत नसल्याने तळेगाव बाजार येथील २४ वर्षीय विनोद खारोडेने हिवरखेड येथील महावितरणच्या कार्यालयात १९ मे रोजी विष घेतले होते. आत्महत्येला महावितरण कंपनी जबाबदार राहील, असेही त्याने चिठ्ठीत नमूद केले होते. विनोदने आत्महत्या करण्यापूर्वी कनिष्ठ अभियंत्यांच्या नावे विनंती अर्ज लिहून ठेवला होता. या अर्जात त्याने विद्युत जोडणीचा उल्लेख केला होता. ८ मे २0१३ रोजी विद्युत जोडणीसाठी अर्ज केल्याचे त्याने अर्जात नमूद केले. विद्युत जोडणीसाठी कंत्राटदाराला २0 हजार रुपये द्यावे लागतील, असे विनोदला सांगण्यात आले. मात्र, मी बोअरवेलसाठी कर्ज काढले असून, माझ्याकडे पैसे नसल्याचे विनोदने अर्जात नमूद केले होते.