हवामानावर आधारित पीक विमा योजनेत तुरीला डावलले!

By Admin | Updated: November 11, 2015 01:10 IST2015-11-10T20:28:25+5:302015-11-11T01:10:01+5:30

मका, जवस, सूर्यफूल व करडई पिकांकडे दुर्लक्ष; योजनेचा सर्वत्र विस्तार आवश्यक.

Weather Based Crop Insurance Scheme! | हवामानावर आधारित पीक विमा योजनेत तुरीला डावलले!

हवामानावर आधारित पीक विमा योजनेत तुरीला डावलले!

राजरत्न सिरसाट/ अकोला : डाळवर्गीय पिकात तूर डाळीला महत्त्वाचे स्थान आहे. जवस, करडई, सूर्यफूल या तेलवर्गीय पिकांसह मका या पिकाची मागणी वाढली आहे; परंतु याच पिकांना नेमके हवामानावर आधारित पीक विमा योजनेतून डावलण्यात आले आहे. विदर्भात या पिकांचे क्षेत्र मोठे असल्याने, या पिकांचा योजनेत समावेश करणे गरजेचे आहे. भात, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आणि ज्वारी या पिकांचे राज्यात उत्पादन घेतले जाते. रब्बी हंगामात ज्वारी, गहू, हरभरा, जवस आदी पिके घेतली जातात; परंतु गेल्या काही वर्षांपासून या पिकांचे उत्पादन घटत आहे. दुष्काळ, गारपीट, पाण्याची कमतरता, नापिकी, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित न मिळणारे भाव, ही प्रमुख कारणे याला कारणीभूत असून, बदलत्या हवामानाच्या या ऋतुचक्रात शेती अर्थकारणावर मोठा प्रभाव झाला आहे. सततच्या दुष्काळ आणि अस्मानी-सुलतानी संकटाचा सामना करणारा शेतकरी आत्महत्या करीत आहे. शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी शासनाने राष्ट्रीय कृषी विमा योजना, हवामानावर आधारित पीक विमा योजना सुरू केली आहे. राष्ट्रीय पीक विमा योजनेंतर्गत पूर, चक्रीवादळ, भूस्खलन व गारपीट या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणार्‍या नुकसानाची भरपाई वैयक्तिक स्तरावर निश्‍चित करण्यासाठी राज्यातील सर्व अधिसूचित पिकांसाठी खरीप हंगामात सर्व अधिसूचना लागू करण्यात येते. भारतीय कृषी विमा कंपनीकडून वैयक्तिक स्तरावर पंचनामे करू न नुकसान निश्‍चित करण्यात येते. हवामानावर आधारित पीक विमा योजना २0१४ खरीप हंगामात ठाणे, रायगड, जळगाव, अहमदनगर, सातारा, सांगली, लातूर, नांदेड, अमरावती, यवतमाळ, वर्धा व नागपूर या निवडक १२ जिल्हय़ात लागू करण्यात आली होती. यामध्ये भात, ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, सोयाबीन व कापूस या पिकासाठी पथदर्शक स्वरू पात ही योजना होती. विदर्भात ११ जिल्हय़ातील खरीप भात, ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, कापूस, सोयाबीन, रब्बी ज्वारी, गहू, हरभरा या पिकांचे मागील दहा वर्षातील जिल्हानिहाय सरासरी क्षेत्र अमरावती विभागात ८५ टक्के व नागपूर विभागात ८0 टक्के असले, तरी या योजनेतून तूर, मका,जवस, सूर्यफूल, करडई इत्यादी पिकांना डावलले. तूर डाळीचे प्रतिकिलो भाव १८0 रुपयांवर गेल्याने या पिकाच्या उत्पादन वाढीसाठी शेतकर्‍यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. जवस हे नागपूर विभागातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर व गडचिरोली या जिलंतील रबीतील प्रमुख पीक आहे. कमी पावसात येणारे पीक अशी त्याची ओळख आहे. सूर्यफूल, करडई, तीळ ही पिकेही कमी पाण्यात येणारी आहेत. ही पिके शेतकर्‍यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी आहेत; पण याच पिकांना पीक विमा योजनेत समाविष्ट केले नाही. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अर्थशास्त्र व सांख्यिकी विभागाचे डॉ. राजेंद्र देशमुख तसेच सेवानवृत्त कृषी सांख्यिकी डॉ. श्यामकांत जहागिरदार व रणजित पाटील यांनी विदर्भातील पाक विम्याचा अभ्यास केला आहे. त्यांनी पीक विमा शेतकर्‍यांना कसा पोषक आहे, त्याचे निष्कर्ष काढले आहेत.

Web Title: Weather Based Crop Insurance Scheme!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.