पाण्याच्या टाक्या गाळाने भरल्या!
By Admin | Updated: June 17, 2015 02:15 IST2015-06-17T02:15:22+5:302015-06-17T02:15:22+5:30
स्वच्छ करण्याचे गटविकास अधिका-यांना आदेश.

पाण्याच्या टाक्या गाळाने भरल्या!
अकोला : जिल्ह्यातील ५४२ ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी असलेल्या ४६0 पाणी साठवण टाक्यांची वर्षानुवर्षांपासून स्वच्छताच झाली नाही. त्यामुळे या टाक्या गाळाने भरल्या असून, ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ही बाब लक्षात घेऊन सर्व टाक्या पंधरा दिवसांत स्वच्छ करण्याचे आदेश ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी मंगळवारी दिलेत. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत ग्रामपंचायतींच्या हद्दीत विविध योजनांतर्गत पाणीपुरवठा योजना राबविली जाते. जिल्ह्यात या योजनांसाठी ४६0 टाक्या बांधण्यात आल्या आहेत. या टाक्यांची देखभाल दुरुस्ती हा ग्रामपंचायतच्या कामाचा भाग आहे. पाणीपट्टी वसूल करून ग्रामस्थांना स्वच्छ पाणी देण्याची जबाबदारी पंचायत विभागाची आहे. त्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची यंत्रणा सहकार्य करीत असते; मात्र पंचायत आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभाग या दोन्ही यंत्रणांकडून वर्षानुवर्षांपासून पाणी साठवण टाक्यांची स्वच्छताच झाली नाही. त्यामुळे पाण्यासोबत वाहून आलेला गाळ साठवण टाक्यांमध्ये जमा झाला आहे. त्यामुळे टाक्यांची साठवण क्षमता तर कमी झालीच, शिवाय गाळामुळे पाणी दूषित होऊन ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही बाब एका पाहणीत आढळून आल्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी मंगळवारी तातडीने आदेश काढून सर्व गटविकास अधिकार्यांना साठवण टाक्यांमधील गाळ काढून टाक्या स्वच्छ करण्याचे निर्देश दिले आहेत. पंधरा दिवसांत टाक्यांची गाळ काढून स्वच्छता करून तसा अहवाल ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे सादर करण्याचे निर्देशही कार्यकारी अभियंत्यांनी दिले आहेत.