महिनाभरापासून पाणीपुरवठा ठप्प!
By Admin | Updated: May 26, 2017 02:47 IST2017-05-26T02:47:48+5:302017-05-26T02:47:48+5:30
गटविकास अधिकाऱ्यांनी पाठविले टँकरकरिता प्रस्ताव

महिनाभरापासून पाणीपुरवठा ठप्प!
पद्माकर लांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वल्लभनगर : अकोला पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वल्लभनगर, सांगवी खु., हिंगणा, तामसवाडी, निंभोरा, कासली बु., खु. गावात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. येथील ग्रामस्थांना पिण्यासाठी खांबोरा ग्रामीण पाणीपुरवठा योजनेवरून पाणीपुरवठा होत असला, तरी महिनोगणती पिण्याचे पाणीच गावात पोहोचत नसल्यामुळे पाचही गावांतील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
ज्यांना पिण्यासाठी पाणी विकत घेणे परवडते, असे लोक २०० रुपये टाकीप्रमाणे पाणी विकत घेत आहेत. ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, असे लोकसुद्धा मोलमजुरी करून पाणी विकत घेत आहेत. कारण पूर्णा नदीचे पाणी पिण्यायोग्य नाही आणि पिण्याच्या पाण्याचा दुसरा स्रोत नाही. येथील गावकरी कुटासा फाट्यावरून ट्रॅक्टरद्वारे पाणी आणत असल्याने एका टाकीला २०० रुपये द्यावे लागत आहेत. त्यामुळे येथे पाणी नाही, ही ओरड बहुतांश ग्रामस्थ करीत आहेत. पाणीटंचाईच्या काळात ग्रामस्थांना पिण्याचे पाणी टँकरद्वारे उपलब्ध करून देण्यात यावे, यासाठी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने अकोला पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर केला आहे. तरी अद्यापही या पाच गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी पंचायत समितीकडून सकारात्मक पावले उचलण्यात आलेली नाहीत.
अकोला पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या वल्लभनगर खु., हिंगणा, तामसवाडी, निंभोरा, कासली बु., कासली खु. या गावांत दरवर्षी भीषण पाणीटंचाई जाणवत असते. मागील वर्षी पाचही गावांत पाणीटंचाईच्या काळात ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. त्यामध्ये एक ग्रामपंचायत क्षेत्रात ५० ते ६० हजार रुपयांची रक्कम टँकरवर खर्च करण्यात आली होती. त्यावेळी निंभोरा येथील काही ग्रामस्थांनी भांडणे केल्याने त्यावेळी तेथील ग्रामपंचायतीने चार दिवसांतच टँकर बंद करण्याबाबतचा ठराव अकोला पंचायत समितीकडे रीतसर पाठविला होता.