पातूर तालुक्यातील ६७ गावांमध्ये पाणीटंचाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:17 IST2021-05-24T04:17:32+5:302021-05-24T04:17:32+5:30

६७ गावांमध्ये पाणीटंचाई असल्यामुळे या गावांचा पाणीटंचाई कृती आराखड्यामध्ये समावेश करण्यात आला. कृती आराखड्यामध्ये प्रामुख्याने विहीर स्रोत गाळ ...

Water shortage in 67 villages of Pathur taluka! | पातूर तालुक्यातील ६७ गावांमध्ये पाणीटंचाई!

पातूर तालुक्यातील ६७ गावांमध्ये पाणीटंचाई!

६७ गावांमध्ये पाणीटंचाई असल्यामुळे या गावांचा पाणीटंचाई कृती आराखड्यामध्ये समावेश करण्यात आला.

कृती आराखड्यामध्ये प्रामुख्याने विहीर स्रोत गाळ काढणे, विहिरी अधिग्रहण करणे, टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, प्रगतिपथावरील नळ योजना पूर्ण करणे, नळ योजनेमध्ये विशेष दुरुस्ती, तात्पुरती पूरक नळ योजना, विंधन विहीर विशेष दुरुस्ती, हातपंप, विहीर पंप, नवीन विंधन विहीर विशेष दुरुस्ती, नवीन सिंचन विहीर दुरुस्ती यामध्ये हातपंप, विहीर पंप, नवीन विंधन विहीर, कूपनलिका, आदी उपाययोजनांचा समावेश असून, ६७ गावांमधील पाणीटंचाईसाठी १३९.५१ लाखांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. माहे जानेवारी ते मार्च २०२१ पर्यंत ६७ गावांपैकी पातूर तालुक्यातील ४७ गावे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यावर ८४.२० लाखांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली. यावर्षी उन्हाचा वाढता पारा पाहता, पातूर तालुक्यातील अन्य गावांमध्ये उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरवर्षी वाढत्या उन्हामुळे हातपंपाच्या पाण्याची खोली, विहिरीच्या पाण्याची पातळी तसेच धरणाची पातळी खोल जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळेवर आणखी काही गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्यास प्रशासनाकडे कोणतीही उपाययोजना नसून, आणखी काही गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्यास प्रशासनाची तारांबळ उडणार असल्याचे बोलले जात आहे.

फोटो:

या गावांमध्ये पाणीटंचाई

पातूर तालुक्यातील बेलुरा खुर्द, बेलुरा बुद्रुक, खामखेड, उमरा, पांगरा, दिग्रस, सावरगाव, जांब, झरंडी, कारला, मलकापूर, भानोस, आस्टूल, सुकळी, दिग्रस खुर्द, हिंगणा, तांदळी खुर्द, आसोला, पळसखेड, आदी गावांचा पाणीटंचाई आराखड्यामध्ये समावेश करण्यात आला असून, या गावांमध्ये चार नळ योजना, हातपंप ८३, विद्युत पंप ८, सार्वजनिक विहिरी २८, खासगी विहिरी २३, विहिरी खोल करणे ६, गाळ काढणे, १४ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

या गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा

मलकापूर, भानोस, आस्टूल या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. पाच नवीन विंधन विहिरी असून, ५५.३१ लाखांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे, तर २० गावांमध्ये २९ उपाययोजना अपेक्षित आहेत.

सध्या तालुक्यातील चार गावांचे विहीर अधिग्रहण करण्यासाठीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. मात्र, एकाही गावाने टॅंकरची मागणी केलेली नाही.

-कपिल पवार, पाणीटंचाई विभागप्रमुख, पंचायत समिती पातूर

Web Title: Water shortage in 67 villages of Pathur taluka!