पाणी टंचाईची फळ पिकांना झळ!
By Admin | Updated: May 13, 2014 00:13 IST2014-05-12T18:43:03+5:302014-05-13T00:13:25+5:30
फळ पिकांना पाणी मिळणे कठीण झाल्याने जिल्ह्यातील जवळपास दहा हजार हेक्टरवरील फळ पिके धोक्यात

पाणी टंचाईची फळ पिकांना झळ!
अकोला : जिल्ह्यात काटेपूर्णा धरणात पाणी उपलब्ध असले तरी विहिरी, कूपनलिकांच्या पाण्याची पातळी घसरली आहे. त्यामुळे फळ पिकांना पाणी मिळणे कठीण झाल्याने जिल्ह्यातील जवळपास दहा हजार हेक्टरवरील फळ पिके धोक्यात आली आहेत.
मागील वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे धरणे, जलसाठे ओव्हरफ्लो झाली होती. यामुळे यावर्षी शेतकरी निश्चिंत होता; परंतु जमिनीतील पाण्याची हवी तेवढी सरासरी वाढली नव्हती, परिणामी विहिरी, कूपनलिकांची पातळी झपाट्याने घसरली आहे. पडलेला पाऊस वेगाने वाहून गेल्यामुळे जमिनीचे हवे तेवढे पुनर्भरण झाले नाही. या सर्व परिस्थितीची झळ भाजीपाला व फळ बागायतदार शेतकर्यांना सोसावी लागत आहे.
जिल्ात सर्वाधिक ३,१५० हेक्टरवर संत्रा आहे. दुसर्या क्रमांकावर २३०० हेक्टर लिंबू असून, केळी २२५० हेक्टरवर आहे. मोसंबी १५ हेक्टर, पेरू १५२, डाळिंब २५०, चिकू ७५, सीताफळ ७५,आवळा ९० तर आंबा ६२५ हेक्टर आहे. गेल्या दोन वर्षात शेतकर्यांनी फळ पिकाचे क्षेत्र वाढविले आहे; परंतु उद्भवणार्या पाणीटंचाईमुळे शेतकरी हतबल झाला आहे. जिल्ह्यातील लिंबाची देशभरात ओळख आहे. परप्रांतात जाणारा येथील लिंबू पाणीटंचाईसह अनेक संकटाचा सामना करीत आहे. हे क्षेत्र वाढवायचे असेल, तर शेतकर्यांना सुविधा, पाण्याची निश्चित हमी हवी आहे.
आताच पाण्याची पातळी घसरली आहे. पुढे पावसाचा खंड पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्यामुळे फळे उत्पादक शेतकरी आतापासूनच चिंतेत आहे.