पाणीटंचाईचा उद्रेक; संतप्त ग्रामस्थांकडून ग्रामपंचायतच्या कॅबिनची तोडफोड
By Admin | Updated: March 31, 2017 19:56 IST2017-03-31T19:53:25+5:302017-03-31T19:56:21+5:30
पाणीटंचाईचा उद्रेक म्हणून बुधवारी प्रभाग क्र.१ च्या महिला व नागरिकांनी मुलाबाळांसमवेत हिवरखेड ग्रामपंचायतीवर घरचे भांडेकुंडे घेऊन मोर्चा काढला.

पाणीटंचाईचा उद्रेक; संतप्त ग्रामस्थांकडून ग्रामपंचायतच्या कॅबिनची तोडफोड
पाण्यासाठी महिला, नागरिकांचा मोर्चा; पोलिसांना केले पाचारण
हिवखेड : उन्हाळा लागत नाही तोच येथील नगारिकांना पाण्याची टंचाई जाणवत असून या पाणीटंचाईचा उद्रेक म्हणून आज प्रभाग क्र. १ च्या महिला व नागरिकांनी आपल्या मुलाबाळांसमवेत हिवरखेड ग्रामपंचायतीवर घरचे भांडेकुंडे घेऊन मोर्चा चढविला. या मोर्चादरम्यान ग्रामपंचायत प्रशासन व नागरिकांच्या मधातील वाद विकोपाला गेल्यामुळे नागरिकांकडून ग्रामपंचायत कॅबिनच्या काचांची तोडफोड करण्यात आली.
हिवरखेड या गावाची लोकसंख्या जवळपास ४० हजार असून गावाला वारी येथील वान धरणातून ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेंतर्गत दैनंदिन पाणीपुरवठा केला जातो. ग्रामपंचायतीकडून मात्र गावाला एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. गावातील व अनेक भागात ग्रामपंचायतीकडून सोडलेले पाणी मुबलक स्वरूपात मिळत नसल्यामुळे गावातील अनेक भागातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. काही वर्षापूर्वी नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा व्हावा, याकरिता ग्रामपंचायत प्रशासनाने आवश्यक त्या ठिकाणी २४ तास चालणारे पाण्याचे सार्वजनिक स्टँडपोस्ट दिले होते. मात्र, काही दिवसापूर्वी हे सार्वजनिक स्टँडपोस्टसुद्धा ग्रामपंचायतीकडून बंद करण्यात आलेत. यामुळे नागरिकांना आणखीच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्या तुलनेत ग्रामपंचायत प्रशासनाकडून पाणीपुरवठ्याची पाणी कर वसुलीदेखील सक्तीने मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पाणी मिळत नसल्यामुळे आज प्रभाग क्र. १ च्या महिला व नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. ग्रामपंचायतीकडून मोर्चाचे समाधान न झाल्यामुळे मोर्चात सहभागी नागरिकांनी ग्रामपंचायत कॅबिनच्या काचांची तोडफोड केली. यामुळे ग्रामपंचायतीचे लोकप्रतिनिधी यशस्वीरित्या गावाला पाण्यासारख्या मूलभूत सुविधा पुरविण्यास अपयशी ठरत आहेत, हे मात्र निश्चित. (प्रतिनिधी)