जलयुक्त शिवार योजनेचा कोटींचा खर्च पाण्यात
By Admin | Updated: August 29, 2015 00:17 IST2015-08-29T00:17:51+5:302015-08-29T00:17:51+5:30
तेल्हारा तालुक्यातील वास्तव; हजारो गॅलन पाणी गेले वाहून!

जलयुक्त शिवार योजनेचा कोटींचा खर्च पाण्यात
तेल्हारा (जि. अकोला) : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत आकोट उपविभागातील तेल्हारा तालुक्यात नदी खोलीकरणाचे काम लोकसहभागातून करण्यात आले असले तरी, यातील माती उत्खननातून काहींनी हजारोंची कमाई केली. पाणी अडविण्याची कोणतीही तरतूद न करता केवळ खोलीकरणच करण्यात आल्याने नदी-नाल्यांमधील हजारो गॅलन पाणी वाहून गेले. महाराष्ट्र शासनाने मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेंतर्गत तेल्हारा तालुक्यात गौतमा नदी, बेलखेड येथील आस नदी, मनब्दा येथील विद्रुपा नदीचे खोलीकरण करण्यात आले. आकोट उपविभागात ह्यपाणी अडवा पाणी जिरवाह्ण मोहिमेला मोठा वाव आहे. या विभागात ५२ पेक्षाही अधिक नदी-नाले आहेत. या नदी-नाल्यांचे पाणी अडवून शेतकर्यांच्या सिंचनाच्या प्रश्नासोबतच खारपाणपट्टय़ातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निकाली निघू शकतो. आदिवासी भागातील पाझर तलावात काही नद्यांचे पाणी वळवून पाण्याच्या पातळीत वाढ करता येऊ शकते. परिसरातील नदी-नाल्यांवर बंधारे व्हावे, अशी मागणी गत अनेक वर्षांपासून होत आहे. परंतु या महत्त्वपूर्ण विषयाकडे विभागातील अधिकार्यांचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत नद्यांचे खोलीकरण करण्यात आले. ही कामे करताना नद्यांचे पाणी अडविण्याचे काम करण्यात आले नाही. त्यामुळे पावसाळय़ात नद्या-नाल्यांमधील हजारो गॅलन पाणी वाहून गेले. हे पाणी अडविले असते, तर सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला असता. (शहर प्रतिनिधी)