कृषी विद्यापीठाची सुरक्षा वार्‍यावर

By Admin | Updated: September 6, 2014 02:13 IST2014-09-06T02:13:52+5:302014-09-06T02:13:52+5:30

अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसर बनला प्रेमीयुगुलांचा अड्डा, सुरक्षा रक्षक नावालाच

War of the safety of Agricultural University | कृषी विद्यापीठाची सुरक्षा वार्‍यावर

कृषी विद्यापीठाची सुरक्षा वार्‍यावर

अकोला : विदर्भाची कृषी पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे विद्यापीठाची सुरक्षा वार्‍यावर असल्याचे वास्तव ह्यलोकमतह्णने शुक्रवारी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आले. पुरेसे सुरक्षा कर्मचारी नसल्याच्या स्थितीत विद्यापीठ परिसरातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, विद्यापीठातील निसर्गरम्य परिसर प्रेमीयुगुलांचा अड्डा बनला आहे. तसेच आमरस्ता नसल्याचे फलक विद्यापीठ परिसरात झळकत असले तरी, ते नावालाच उरले असून, परिसरात वाहनांची सर्रास वाहतूक होते. अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे संपूर्ण राज्यातील शेतकर्‍यांसाठी महत्त्वाचे आहे. विद्यापीठात शेतीपयोगी अनेक पिकांवर तसेच बिजांवर आणि रोग व किडींवर अनेक प्रकारचे महत्त्वपूर्ण संशोधन विद्यापीठात वेगवेगळ्या संशोधन केंद्रांवर केले जाते. त्यानुषंगाने विद्यापीठातील विविध संशोधन केंद्रांसह महत्त्वपूर्ण असलेले विभाग आणि परिसराची सुरक्षा अभेद्य असणे अपेक्षित आहे. विद्यापीठ परिसरात शेतकरी व कर्मचारी वगळता इतर नागरिकांना येण्यास मनाई असून, परिसरातील रस्त्यांवरून ये-जा करण्यावर बंदी आहे. मात्र, विद्यापीठाची सुरक्षा अत्यंत ढिसाळ असून, विद्यापीठाचा परिसर प्रेमीयुगुलांसाठी पर्वणीच ठरत आहे.

      चारही बाजूने असलेल्या प्रवेशद्वारातून विद्यापीठ परिसरात चोरवाटा काढत शहरातील टवाळखोर आणि प्रेमीयुगुलांचा मुक्त संचार असतो. त्यामुळे विद्यापीठातील विविध रस्त्यांसह संपूर्ण परिसर प्रेमीयुगुलांसाठी मौज मारण्याचा अड्डाच बनल्याचे चित्र आहे. विद्यापीठ परिसरातील सर्वच रस्त्यांवरून वाहनांची सर्रास वाहतूक सुरू असते. पीडीकेव्ही सुरक्षा अधिकारी व्ही वाय मानकर यांनी आमच्याकडे माणसंच कमी असल्याची सबब दिली आहे. असलेल्या सुरक्षा रक्षकांची तीन शिफ्टमध्ये ड्यूटी लावावी लागते. सुटीच्या दिवशीही काम करावे लागते. सुरक्षा रक्षक कमी असल्यामुळे काही ठिकाणी आवश्यकता असतानाही रक्षक तैनात करता येत नाही. आम्ही विद्यापीठ परिसरातील काही रस्ते बंद केले आहेत. मात्र लोकांना शॉर्टकटची सवय लागली असल्यामुळे ते विद्यापीठ परिसरातूनच ये- जा करतात.

** ठिकाणं २५, कर्मचारी १३

विद्यापीठ परिसरात सुरक्षा रक्षक तैनात ठेवण्याचे २५ ठिकाणं आहेत. त्यामुळे तीन शिफ्टमध्ये ७५ सुरक्षा रक्षकांची गरज भासते. मात्र, केवळ ३८ सुरक्षा रक्षक असल्यामुळे एका पाळीत १२ ते १३ सुरक्षा रक्षक असतात. मुख्य प्रवेशद्वार व कुलगुरू बंगला व मुख्य इमारतीत दोन ते तीन सुरक्षा रक्षक तैनात करावे लागत असल्यामुळे २५ पैकी १0 ठिकाणीच सुरक्षा रक्षक असतात. अन्य ठिकाणी सुरक्षा रक्षक नसतात.

** सुरक्षा रक्षकांची पदे रिक्त

पीडीकेव्हीत सुरक्षा रक्षकांची एकूण १0४ पदे मंजूर आहेत. मात्र त्यापैकी सध्या केवळ ७९ सुरक्षा कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी २६ कर्मचारी हे अन्य विभागांकडे कार्यरत आहेत. उर्वरित ३८ स्थायी सुरक्षा कर्मचारी तीन पाळीत कार्यरत असतात. आवश्यकते-नुसार सुरक्षा कर्मचारी नसल्यामुळे सुरक्षा विभागाला ड्यूटी लावताना कसरत करावी लागते. सुरक्षा कर्मचारी नवृत्त होत असून, भरती प्रक्रिया मात्र बंदच आहे. त्यामुळे विद्यापीठातील प्रक्षेत्रावर सुरक्षा कर्मचार्‍यांची वानवा भासत आहे

. ** प्रेमीयुगुलांचा अड्डा

पीडीकेव्हीचा परिसर हा प्रेमीयुगुलांचा अड्डा बनले आहे. हिरवा निसर्ग नटला असलेला हा परिसर प्रियकर व प्रेयसींना नेहमीच खुणावतो. परिसर मोठा असून, यामध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक रस्ते आहेत. त्यातच सुरक्षा रक्षक नाही व कुणी हटकत नसल्यामुळे अनेक प्रेमीयुगुल झाडे झुडपांमध्ये अश्लील चाळे करताना निदर्शनास येतात.

** असे आढळून आले वास्तव!

दुपारी २.२0 वाजता कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारावर एकही सुरक्षा कर्मचारी नव्हता, प्रवेशद्वाराला लागूनच असलेल्या चौकीमध्ये एक सुरक्षा कर्मचारी कार्यरत असल्याचे दिसत होते. दुपारी २.३0 वाजता कृषी विद्यापीठ परिसरातील पीएच.डी. होस्टेल परिसरात एकही स्थायी सुरक्षा कर्मचारी नव्हता. एक रोजंदार कर्मचारी कार्यरत असल्याचे आढळून आले. दुपारी २.३५ वाजता कृषी विद्यापीठातील तेलबिया संशोधन विभाग, कापूस संशोधन विभाग या दोन्ही विभागाच्या प्रवेशद्वारावर एकही सुरक्षा कर्मचारी नसल्याचे आढळून आले. दुपारी ३ वाजता कृषी विद्यापीठातील मध्यवर्ती संशोधन केंद्र प्रवेशद्वार आणि परिसरात एकही स्थायी सुरक्षा कर्मचारी नव्हता. संशोधन केंद्राच्या कार्यालय परिसरात एक रोजंदार सुरक्षा कर्मचारी कार्यरत होता. परिसरात दुचाकी व चारचाकी वाहनांना प्रवेशबंदी असली तरी, या संशोधन केंद्र परिसरात सर्रास वाहनांची वाहतूक होत असल्याचे दिसून आले.

** असे झाले स्टिंग.

कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारातून दुपारी १.४५ वाजता आतमध्ये सरळ प्रवेश केला. या ठिकाणी सुरक्षा रक्षक होता. मात्र कुणीही हटकले नाही. प्रशासकीय इमारतीत सरळ प्रवेश करताना कुणीही हटकले नाही. मध्यवर्ती संशोधन केंद्र ही विद्यापीठातील एक महत्त्वाची इमारत. या ठिकाणी २.२0 वाजता लोकमत चमूने सरळ आतमध्ये प्रवेश केला. या ठिकाणी दुचाकी वाहनांना प्रवेश नाही, असे फलक लावले होते. मात्र, चमूतील सदस्यांनी दोन दुचाकी आतमध्ये नेल्या. येथे सुरक्षा रक्षक आहे की नाही? असे विचारल्यावर आतमधील कंत्राटी सुरक्षा रक्षक बाहेर आला. मिरची व भाजीपाला संशोधन केंद्रात चमूने २.४६ वाजता प्रवेश केला. येथे कुणीही सुरक्षा रक्षक नव्हता. येथे उपस्थित मजुरांना विचारल्यावर चार वाजेपर्यंत सुरक्षा रक्षकच नसतात. तर त्यांची ड्यूटी दुपारी चारपासून सुरू होते, असे सांगितले. प्रशासकीय इमारत ते मध्यवर्ती संशोधन केंद्रादरम्यानच्या रस्त्यावर काही शाळकरी मुले खेळत होती. ही मुले झाडांवर चढत होती व मस्ती करीत होती. याच रस्त्यापासून दूर झुडपांमध्ये दोन प्रेमीयुगुल बसले होते.

Web Title: War of the safety of Agricultural University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.