जटिल समस्यांवर वेगळा विदर्भ हाच पर्याय !
By Admin | Updated: September 12, 2016 02:08 IST2016-09-12T02:08:15+5:302016-09-12T02:08:15+5:30
शेगाव येथील व-हाड परिषदेत विदर्भवाद्यांचा निर्धार.

जटिल समस्यांवर वेगळा विदर्भ हाच पर्याय !
शेगाव (जि. बुलडाणा), दि. ११: शेतकरी आत्महत्या व बेरोजगारीवर केवळ वेगळा विदर्भ हा एकमेव पर्याय असल्याचे स्पष्ट करुन वेगळा विदर्भ निर्माण करण्याचा निर्धार वर्हाड परिषदेत विदर्भवाद्यांनी रविवारी येथे व्यक्त केला.
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने शेगाव येथील वर्धमान मंगल कार्यालयात रविवारी वर्हाड परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार वामनराव चटप होते तर उद्घाटक म्हणून अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले उपस्थित होते.
यावेळी मत व्यक्त करताना डॉ. खांदीवाले म्हणाले, की विदर्भात शेतकरी मोठय़ा संख्येने त्यामुळे विदर्भ वेगळा झाल्यावर शेतकर्यांचा विकास करायला हवा. पश्चिम महाराष्ट्रातील ऊस, द्राक्षवाल्या शेतकर्यांसाठी सरकार काम करते, त्यामुे ऊस व द्राक्ष उत्पादक शेतकरी कधीच आत्महत्या करीत नाहीत. कापूस उत्पादक शेतकर्याशी सरकारला काहीच घेणे देणे नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व सिंचन प्रकल्पांचे काम पुर्ण झाले मात्र, विदर्भातील प्रकल्पांचे काम अजूनही अर्धवट आहे. हा विदर्भावर अन्यायच असून, त्यामुळे विदर्भ वेगळा करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
विदर्भातील तरूणांना २३ टक्के नोकर्या देण्याचे महाराष्ट्रात सामील होताना करार करताना आश्वासन देण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र ८ टक्केच नोकर्या देण्यात आल्या. त्यामुळे विदर्भावर सातत्याने अन्यायच होत आला आहे. विदर्भात वीज तयार होते, मात्र ती वीज पश्चिम महाराष्ट्राला दिली जाते. वीज निर्माण करणारा विदर्भ अंधारात राहतो. सिंचनाचा अनुशेष, शेतकर्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी अशा अनेक समस्यांनी विदर्भातील जनतेला ग्रासले आहे. आम्हाला या समस्या सोडवून पाहिजे नाही तर विदर्भ वेगळा पाहिजे आहे, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला अमरावती विभागातील शेकडो नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य निमंत्रक राम नेवले, प्रवीणकुमार चक्रवर्ती, अँड. नंदाताई पराते, रमेश गजबे आदी उपस्थित होते.