भाजीपाल्याची आवक नाही!

By Admin | Updated: June 3, 2017 01:37 IST2017-06-03T01:37:01+5:302017-06-03T01:37:01+5:30

अकोल्याची स्थिती : ७० टक्के अडत दुकानदार फिरकले नाही बाजारात

Vegetable does not arrive! | भाजीपाल्याची आवक नाही!

भाजीपाल्याची आवक नाही!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि पिकाला हमीभाव मिळावा म्हणून राज्यभरातील शेतकरी १ जूनपासून संपावर गेल्याने अकोल्यातील भाजीपाल्यांचे भाव कडाडले आहे. जिल्ह्याशेजारील भाजीपाला आणि सांभार बाजारपेठेत न आल्याने शुक्रवारी सांभार कोथिंबिर दोनशे रुपये किलोच्या भावाने बाजारात विकला गेला. शुक्रवारी पहाटे जिल्ह्याबाहेरून येणारा भाजीपाला न आल्याने बाजारपेठेत त्याचा परिणाम जाणवला. शेतकऱ्यांचा माल बाजारात न आल्याने जनता भाजी बाजारातील ७० टक्के अडत दुकानदार शुक्रवारी बाजारात फिरकलेच नाही.
गवार शेंगा, टमाटे, दुधी भोपळा, शिमला मिरची, वांगे, फुलकोबी, पत्ताकोबी, बीट यांचे भाव ४० रुपये किलो झाले असून, २०० रुपये कि लोच्या दराने सांभाराची विक्री होत असल्याची माहिती भाजी विक्रेता नरेश लोणकर यांनी दिली. अकोल्यातील जनता भाजी बाजारात दररोज मध्यरात्री मोठ्या प्रमाणात भाजीपाला येतो; मात्र शेतकऱ्यांनी संप छेडल्याने गुरुवारच्या उत्तररात्रीपासून शुक्रवारी पहाटेपर्यंत एकही गाडी माल घेऊन बाजारात आली नाही. मध्य प्रदेशातील भाजीपाला दररोज अकोल्यात येतो. गुरुवारी रात्री सांभार आणि पत्ताकोबीचा साठा अकोल्यात दाखल झाला; मात्र शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे रूप पाहून तेदेखील हादरले आहेत. शुक्रवारी रात्री भाजीपाला न पाठविण्याचा निर्णय मध्य प्रदेशातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी घेतला आहे. अमरावती येथून पालक, मेथी आणि घोळची भाजी दररोज ४०७ आणि इतर गाड्यांतून येत असते; मात्र अकोल्यापेक्षा जास्त संपाची तीव्रता अमरावतीत असल्याने अमरावती मार्गे येणारा भाजीपाला शुक्रवारच्या पहाटे अकोल्यात पोहोचला नव्हता. त्यामुळे सांभारपाठोपाठ पालक, चवळी, मेथी आदी हिरव्या भाज्यांचे भाव वधारले आहेत. अकोल्याच्या जनता बाजारात भाजीपाल्याचे भाव वधारल्याने गाडी आणि ठेलेवाल्यांनीदेखील त्यापुढची झेप घेतली आहे.
अकोल्याच्या बाजारपेठेत दररोज नाशिक, श्रीरामपूर, बुलडाणा, चिखली, पातूर, अकोट, वाडेगाव आदी परिसरातून कारले, वांगी, भेंडी, बरबटी आदी भाजीपाल्यांचा साठा येत असतो; मात्र शुक्रवारी पहाटेपर्यंत हा साठा न पोहोचल्याने ताज्या भाजीपाल्यांची कमतरता बाजारपेठेत जाणवली. ही तीव्रता आंदोलन काही दिवस सुरू राहिल्यास अधिक मोठ्या प्रमाणात जाणवण्याचे संकेत मिळत आहेत.

शेतकऱ्यांचा माल गुरुवारच्या मध्यरात्रीपासून येणार नाही, याची कल्पना आल्याने ७० टक्के अडत दुकानकारांनी शुक्रवारी जनता भाजीबाजारात पाऊलदेखील ठेवले नाही.
-राजेश ढोमणे, अडत दुकानदार, अकोला.

Web Title: Vegetable does not arrive!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.