भरधाव ट्रकने विद्यार्थिनीस चिरडले
By Admin | Updated: November 21, 2015 01:50 IST2015-11-21T01:50:40+5:302015-11-21T01:50:40+5:30
अकोला रेल्वे मालधक्क्यासमोरील घटना, ट्रक जप्त, चालक फरार.

भरधाव ट्रकने विद्यार्थिनीस चिरडले
अकोला: रेल्वे स्टेशनसमोर असलेल्या मालधक्क्यासमोरून जात असलेल्या एका भरधाव ट्रकने शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास शिवाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीस चिरडले. या अपघातात १९ वर्षीय विद्यार्थिनीचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेनंतर काही क्षणातच ट्रकचालक फरार झाला. रामदासपेठ पोलिसांनी ट्रकसह अपघाताग्रस्त दोन्ही वाहने जप्त केली. गोरक्षण रोडवरील सहकारनगरमधील रहिवासी आरती ईश्वरसिंह ठाकूर (१९) ही शिवाजी महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. ती शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास एमएच ३0 एसी ८३९९ क्रमांकाच्या दुचाकीने रेल्वे स्टेशनसमोरील मालधक्का परिसरातून जात असताना पाठीमागून येणार्या, आकोट येथे संत्री भरण्यासाठी जात असलेल्या जीजे १९ व्ही ७२४४ क्रमांकाच्या ट्रकने तिला जबर धडक दिली. या धडकेने विद्यार्थिनी दुचाकीसह खाली कोसळली. त्यानंतर भरधाव ट्रक विद्यार्थिनीच्या अंगावरून गेला. यामध्ये विद्यार्थिनीचा जागेवरच मृत्यू झाला. दीड महिन्याच्या कालावधीत भरधाव ट्रकमुळे झालेला हा दुसरा अपघात आहे. घटनेनंतर ट्रकचालक ट्रक सोडून घटनास्थळावरून फरार झाला. रामदासपेठ पोलिसांनी ट्रक व विद्यार्थिनीची दुचाकी जप्त करून हरीशचंद्र विक्रमसिंह कुशवाह यांच्या तक्रारीवरून ट्रकचालकाविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम २७९, ३0४ नुसार गुन्हा दाखल केला. वाहतूक शाखेची खाबुगिरीही जबाबदार दीड महिन्यापूर्वी मध्यवर्ती बसस्थानकासमोर एका महिलेला भरधाव ट्रकने अशाच प्रकारे चिरडले होते. त्यानंतर शुक्रवारी आणखी एका विद्यार्थिनीस भरधाव ट्रकने चिरडले. शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवरून बहुतांश ट्रक भरधाव जातात; मात्र त्याकडे जिल्हा वाहतूक शाखेचे कर्मचारी व अधिकारी ह्यअर्थह्णपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप घटनास्थळावर उपस्थित नागरिकांनी केला. एका पॉइंटवरून ट्रक सोडण्यासाठी २00 ते ३00 रुपये वाहतूक पोलीस घेत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. वाहतूक पोलिसांच्या खाबुगिरीसाठी शहरातील नागरिकांचा जीव धोक्यात घालण्याचा येत असल्याचेही या घटनेवरून समोर आले आहे. मालधक्का तातडीने बंद करणार- जिल्हाधिकारी शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील मालधक्का येथे जड वाहनांची मोठय़ा प्रमाणात वाहतूक होते. त्यामुळे अपघाताच्या घटना होतात. या पृष्ठभूमीवर मालधक्का बोरगाव किंवा शिवणी येथे स्थानांतरित करण्याच्या सूचना मध्य रेल्वेच्या विभागीय प्रबंधकांना महिनाभरापूर्वी देण्यात आल्या होत्या; मात्र अद्यापही मालधक्का हलविण्यात आला नाही. त्यामुळे रेल्वे स्टेशन परिसरातील मालधक्का तातडीने बंद करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी शुक्रवारी सांगितले.