तिरंगी लढत, इच्छुक उमेदवारांमध्ये रस्सीखेच!
By Admin | Updated: June 12, 2014 20:31 IST2014-06-12T20:27:37+5:302014-06-12T20:31:31+5:30
आकोट विधानसभा मतदारसंघामध्ये विजयाचे समीकरण निश्चित करणे शेवटच्या क्षणापर्यंत कठिण आहे.

तिरंगी लढत, इच्छुक उमेदवारांमध्ये रस्सीखेच!
आकोट : पाडापाडीचे राजकारण, जातीय मुद्यांचा प्रभाव, सहकार क्षेत्राची रणनीती आदी डावपेचांमध्ये गुरफटलेल्या आकोट विधानसभा मतदारसंघामध्ये विजयाचे समीकरण निश्चित करणे शेवटच्या क्षणापर्यंत कठिण आहे. गटातटाच्या राजकारणात गुंतलेली युती आणि आघाडी तसेच केवळ सोयीचे राजकारण करणारा भारिप-बमसं, यांच्यात होणार्या तिरंगी लढतीमध्ये मैदानात उतरण्याचे वेध इच्छुक उमेदवारांना लागले आहेत.
आकोट विधानसभा मतदारसंघावर १९८९ पर्यंत काँग्रेसचे वर्चस्व होते. १९८९ मध्ये शिवसेना-भाजप युतीने हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतला. त्यावेळी काँग्रेसचे सुधाकरराव गणगणे व शिवसेनेचे डॉ. जगन्नाथ ढोणे यांच्यात लढत होऊन, डॉ. ढोणे विजयी झाले होते. १९९४ मध्ये पुन्हा काँग्रेसचे सुधाकरराव गणगणे यांना शिवसेनेचे रामेश्वर कराळे यांनी पराभवाची धुळ चाखली. या दोन्ही निवडणुकांमध्ये आलेले अनुभव विचारात घेऊन, १९९९ च्या निवडणुकीत काँग्रेस-भारिप बमसंची युती झाली. या निवडणुकीत भारिप बमसंचे रामदास बोडखे हे विजयी झाले. त्यांनी शिवसेनेचे रामेश्वर कराळे आणि शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढविणारे डॉ. जगन्नाथ ढोणे यांना पराभूत केले. २00४ च्या निवडणुकीत रामदास बोडखे यांनी भारिप-बमसं सोडून काँग्रेसची उमेदवारी मिळवली. त्यांची लढत भारिप बमसंचे भाऊराव अंबळकार, अपक्ष उमेदवार हिदायत पटेल आणि शिवसेनेचे माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांच्याशी झाली. या चौरंगी लढतीत गुलाबराव गावंडे विजयी झाले.
२00९ च्या निवडणुकीत दर्यापूरचे माजी आमदार प्रकाश भारसाकळे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आकोट मतदारसंघात उडी घेतली. त्यामुळे चौरंगी लढत झाली. या लढतीमध्ये ३७ हजार ८३४ मतं घेऊन, शिवसेनेचे संजय गावंडे विजयी झाले. काँग्रेसचे सुधाकरराव गणगणे यांना ३६ हजार ८६९, भारिप-बमसंचे प्रभाकर मानकर यांना ३२ हजार ६२९ तर अपक्ष उमेदवार प्रकाश भारसाकळे यांना ३२ हजार ४१५ मतांवर समाधान मानावे लागले.
विशेष म्हणजे, २00४ ची निवडणूक वगळता १९८९ पासून २00९ पर्यंत या मतदारसंघावर शिवसेना-भाजपचा वरचष्मा राहीला आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघामध्ये भाजप-सेना युतीला ७७ हजार ९८४, काँग्रेसला ४५ हजार ५६0 तर भारिप-बमसंला ३३ हजार १५९ मतं मिळाली. त्यामुळे हा शिवसेनेच्या वाटयाला असला तरी, मोदी लाट पाहता भाजप या मतदारसंघाकडे टक लावून आहे. दुसरीकडे आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची झालेली पडझड पाहता, राष्ट्रवादी काँग्रेसही या मतदारसंघाकडे लक्ष ठेवून आहे; तथापि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल हे स्वत:च या मतदारसंघाचे रहिवासी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची डाळ शिजणे कठीण आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेची कामगिरी चांगली असल्याने, भाजपचेही मनसुबे यशस्वी होणे सोपे नाही. निवडणुकीच्या या राजरंगात मनसेची भूमिकाही निश्चितच महत्वाची राहणार आहे.
या मतदारसंघात मराठा, कुणबी, माळी, बारी, मुस्लीम आणि दलित मते निणार्यक संख्येमध्ये आहेत; मात्र आकोट मतदारसंघात मोडणार्या तेल्हारा तालुक्याच्या वाट्याला कोणत्याही पक्षाची उमेदवारी सहजासहजी येत नसल्याने या तालुक्याची मतं व सहकार क्षेत्राची रणनीती निर्णायक राहणार आहे. सद्यस्थितीमध्ये या मतदारसंघात शिवसेनेतर्फे आमदार संजय गावंडे, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे, श्याम देशमुख, माजी आमदार रामेश्वर कराळे हे प्रबळ दावेदार आहेत. काँग्रेसतर्फे माजी राज्यमंत्री सुधाकरराव गणगणे किंवा त्यांचे पुत्र महेश गणगणे, माजी राज्यमंत्री रामदास बोडखे किंवा त्यांचे पुत्र माजी नगराध्यक्ष प्रा. संजय बोडखे, नगराध्यक्ष रामचंद्र बरेठिया, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांची नावं चर्चेत आहेत. भारिप- बहुजन महासंघातर्फे माजी नगराध्यक्षा डॉ. मनीषा मते, माजी नगराध्यक्ष भाऊराव अंबळकार, माजी जि.प. सदस्य प्रदीप वानखडे, काशिराम साबळे, प्रभाकर मानकर हे उत्सुक आहेत. मनसेतर्फे प्रा. राजेंद्र पुंडकर आणि मुकेश निचळ तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राजीव बोचे आणि रमेश हिंगणकर यांची प्रबळ दावेदारी राहू शकते.
सध्याच्या राजकीय परिस्थितीचा वेध घेतला, तर उमेदवार जाहीर करताना प्रत्येक पक्षाला मतदारसंघाच्या सर्वच समिकरणांचा विचार करावा लागेल, असे चित्र दिसत आहे.