तीन बाजार समित्या बंद

By Admin | Updated: July 12, 2016 01:26 IST2016-07-12T01:26:32+5:302016-07-12T01:26:32+5:30

व्यापारी, अडत्यांनी पुकारले असहकार आंदोलन : फळे, भाजीपाला नियमनमुक्तीचा कडाडून विरोध.

Three Market Committees Closed | तीन बाजार समित्या बंद

तीन बाजार समित्या बंद

अकोला : फळे व भाजीपाला नियंत्रणमुक्त करतानाच शेतकर्‍यांऐवजी खरेदीदाराकडून व्यापार्‍यांचे कमिशन (अडत) घेण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात व्यापारी, अडत्यांनी ९ जूलैपासून पुकारलेल्या बंदमुळे जिल्ह्यातील तीन कृषी उत्पन्न बाजार समित्या सोमवारी कडकडीत बंद होत्या. त्यामुळे शेतकर्‍यांच्या शेतमालाची विक्री सध्या बंद आहे.
कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये फळे आणि भाजीपाल्याची थेट विक्री करणार्‍यांना शासनाने सर्व नियमातून सूट दिली. बाजार समितीमध्ये मात्र शेतकर्‍यांऐवजी ग्राहकांकडून अडत घेण्याचे बंधन घातले. या दुहेरी भूमिकेचा निषेध करण्यासाठी व्यापार्‍यांनी बेमुदत सामूहिक आंदोलन सुरू केले आहे.
जिल्ह्यात अकोला, मूर्तिजापूर, तेल्हारा येथे कृषी उत्पन्न बाजार समिती असून, कानशिवणी व बोरगाव मंजू आदी उपबाजार समिती अस्तित्वात आहे. व्यापार्‍यांनी पुकारलेल्या बंदमुळे सर्वच बाजार समित्यांचे व्यवहार सोमवारी ठप्प झाले.
सद्यस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकर्‍यांकडून एकूण रकमेच्या ८ टक्के अडत वसूल केली जाते. मात्र, शेतकर्‍यांच्या हितास्तव शासनाने शेतकर्‍यांकडून अडत वसूल न करता ग्राहकांकडून वसुलीचा निर्णय घेतला. त्यास व्यापार्‍यांनी विरोध दर्शविला आहे.
तथापि, अडते आणि व्यापार्‍यांनी शेतीमाल खरेदी-विक्रीचा व्यवहार बेमुदत बंद ठेवण्याचे घोषित केल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन बाजार समिती प्रशासन तथा जिल्हा प्रशासनाने योग्य समन्वय साधून या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकर्‍यांमधून जोर धरत आहे.

Web Title: Three Market Committees Closed