दूषित पाण्याने हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात
By Admin | Updated: January 15, 2015 01:26 IST2015-01-15T01:26:06+5:302015-01-15T01:26:06+5:30
नेहरू पार्क पाण्याच्या टाकीतून दूषित पाण्याचा पुरवठा.

दूषित पाण्याने हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात
अकोला : शहरातील उच्चभ्रू परिसरात पाणीपुरवठा केल्या जाणार्या पाण्याच्या टाकीच्या परिसरात मोठय़ा प्रमाणात अस्वच्छता असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ३३ लिकेजेससह ५ व्हॉॅल्व निकामी असून, त्यामुळे नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे.
नेहरू पार्क समोर महापालिकेची मोठी पाण्याची टाकी आहे. या टाकीतून रामनगर, शास्त्रीनगर, पत्रकार कॉलनी, रतनलाल प्लॉटसह शहरातील उच्चभ्रू वस्तीत पाणीपुरवठा केला जातो. जवळपास ५0 हजार नागरिकांना या पाण्याच्या टाकीतून पाणी पुरविल्या जाते. या टाकीची स्वच्छता मागील अनेक वर्षांपासून झालेली नाही. तसेच टाकीच्या आजूबाजूला संरक्षण भिंत नाही. टाकीतून पाइपद्वारे खाली पाणी आणल्या जाते आणि खाली जिथे व्हॉल्व आहे तिथे मोठय़ा प्रमाणात घाण साचली आहे. ही घाण काढण्यात येत नसल्यामुळे पाणी दूषित झाले आहे. हेच पाणी पुढे नागरिकांना पोहोचविल्या जाते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नेहरू पार्क पाण्याच्या टाकीतून ज्या भागात पाणीपुरवठा होतो. त्या भागातील ३३ पाइपलाइनमध्ये लिकेजेस आहेत. सोबतच ६ व्हॉल्व निकामी आहेत, याची देखील दुरुस्ती होणे गरजेचे आहे; परंतु दुरुस्ती होत नसल्यामुळे पाण्याचा अपव्यय मोठय़ा प्रमाणात होत आहे. यावर महापालिका प्रशासनाचे नियंत्रण नसल्यामुळे सगळे आलबेल आहे.
महापालिका प्रशासनाला आपल्या अधिकार्यांच्या केबिन सजविण्यासाठी लाखो रुपये खर्च करता येतो; परंतु नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असलेल्या पाण्याचे व्हॉल्व दुरुस्त करण्यासाठी व पाइपलाइनचे लिकेज दुरुस्त करण्यासाठी पाच-पन्नास हजार रुपये नाहीत, ही खेदाची बाब आहे. तत्काळ दुरुस्ती न झाल्यास व पाण्याच्या टाकीचा परिसर स्वच्छ न झाल्यास घाण पाणी अधिकार्यांना पाजण्याचे आंदोलन करण्याची भूमीका नगरसेवक अजय शर्मा यांनी व्यक्त केली.