तंटामुक्त गाव पुरस्काराची रक्कम अजूनही अखर्चित
By Admin | Updated: May 28, 2014 21:52 IST2014-05-28T21:49:43+5:302014-05-28T21:52:18+5:30
पात्र गावांना पुरस्कारही प्रदान केले; परंतु मूर्तिजापूर तालुक्यातील पारद येथील तंटामुक्त ग्राम समितीने पुरस्कार रूपाने मिळालेल्या २ लाख रुपयांची रक्कम गाव विकासासाठी अजूनही खर्च केली नसल्याची माहिती समोर आली आहे.

तंटामुक्त गाव पुरस्काराची रक्कम अजूनही अखर्चित
मूर्तिजापूर : राज्य शासनाने मोठा गाजावाजा करून महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम संकल्पना आणली व पात्र गावांना पुरस्कारही प्रदान केले; परंतु मूर्तिजापूर तालुक्यातील पारद येथील तंटामुक्त ग्राम समितीने पुरस्कार रूपाने मिळालेल्या २ लाख रुपयांची रक्कम गाव विकासासाठी अजूनही खर्च केली नसल्याची माहिती समोर आली आहे.
देशाचा विकास साधायचा असेल तर प्रथम खेड्यांचा सर्वांगीण विकास व्हायला हवा, या महात्मा गांधींच्या विचाराची कास धरून राज्य शासनाने खेड्यांच्या विकासासाठी व गावातील तंटे गावातच समेटाने मिटविण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम योजना कार्यान्वित केली. या योजनेचे सर्व निकष पूर्ण करणार्या गावांना राज्य शासनाकडून पुरस्कारही प्रदान करण्यात आले. त्यापैकी मूर्तिजापूर तालुक्यातील पारद गावाला वर्ष २०११-१२ चा तंटामुक्त ग्राम पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारात मिळालेली रक्कम गावाच्या विकासावर खर्च करणे अपेक्षित होते; परंतु दोन वर्षांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही हा निधी अखर्चितच आहे. तंटामुक्त ग्रामचा पुरस्कार तंटामुक्ती समितीला मिळत असला तरी तो निधी खर्च करण्याचा अधिकार संबंधित गावाच्या ग्रामपंचायतीस देण्यात आला आहे. असे असतानाही ग्रामपंचायतीला हा निधी खर्च करण्याचा मुहूर्त का सापडत नाही, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.