राज्यात २९ हजारांवर रोहयोची कामे सुरू
By Admin | Updated: May 30, 2014 01:39 IST2014-05-29T19:54:50+5:302014-05-30T01:39:59+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यभरात सध्या २९ हजार ७७५ कामे सुरू आहेत.

राज्यात २९ हजारांवर रोहयोची कामे सुरू
अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यभरात सध्या २९ हजार ७७५ कामे सुरू आहेत. त्यामध्ये ग्रामपंचायत व विविध यंत्रणा स्तरावरील कामांचा समावेश आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायत स्तर व यंत्रणा स्तरावर कामे केली जातात. त्यामध्ये प्रामुख्याने शेतरस्ते, अंतर्गत रस्ते, नाला सरळीकरण, सिंचन विहिरी, सिमेंट बांध, ढाळीचे बांध, वृक्षारोपण, वैयक्तिक व सार्वजनिक शौचालये व इतर कामांचा समावेश आहे. मागणी प्राप्त होताच मजुरांना काम उपलब्ध करून, देण्यासाठी रोहयो अंतर्गत राज्यात एकूण ४ लाख ९० हजार ४७६ कामांचे नियोजन करण्यात आले आहे. नियोजनाच्या तुलनेत गेल्या २४ मे अखेर राज्यातील सहा विभागांतर्गत ३३ जिल्ह्यांमध्ये २९ हजार ७७५ रोहयोची कामे सुरू होती. यामध्ये ग्रामपंचायतींच्या स्तरावर २४ हजार २४८ आणि विविध यंत्रणा स्तरावर ५ हजार ५२७ कामांचा समावेश आहे. असे शासनाच्या नियोजन व रोहयो विभागामार्फत गत २४ मे अखेरच्या साप्ताहिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.
**विभागनिहाय सुरू असलेली रोहयो कामे!
विभाग कामे
कोकण २,३३९
नाशिक ३,७०३
पुणे १,६१९
औरंगाबाद ५,३३१
अमरावती ५,९५४
नागपूर १०,८२९
एकूण २९,७७५
आठवडाभरात १,४२० कामांची वाढ!
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत गेल्या १७ मे रोजी संपलेल्या आठवड्यात राज्यात एकूण २८ हजार ३५५ कामे सुरू होती. २४ मे अखेर संपलेल्या आठवड्यात राज्यातील सुरू असलेल्या रोहयो कामांची संख्या २९ हजार ७७५ वर पोहोचली. म्हणजेच आठवडाभरात राज्यभरात १ हजार ४२० रोहयो कामांची वाढ झाल्याचे चित्र आहे.
विभागनिहाय कामांमध्ये नागपूर विभाग पुढे!
राज्यातील विभागनिहाय सुरू असलेल्या रोहयो कामांची आकडेवारी लक्षात घेता, रोहयो कामांमध्ये राज्यात नागपूर विभाग पुढे असल्याचे दिसत आहे. नागपूर विभागात १० हजार ८२९ कामे सुरू असून, त्याखालोखाल विदर्भातीलच अमरावती विभागात ५ हजार ९५४ कामे सुरू आहेत.