साठा निर्बंधातून सोयाबीन वगळले!
By Admin | Updated: November 18, 2016 03:09 IST2016-11-18T03:09:17+5:302016-11-18T03:09:17+5:30
जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत असलेल्या साठा निर्बंधातून सोयाबीन वगळण्यात येत असल्याचा शासनाचा आदेश.

साठा निर्बंधातून सोयाबीन वगळले!
संतोष येलकर
अकोला, दि. १७- अकोला जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत असलेल्या साठा निर्बंधातून सोयाबीन वगळण्यात येत असल्याचा आदेश शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत ८ नोव्हेंबर रोजी देण्यात आला आहे. त्यामुळे आता सोयाबीन साठवणुकीसाठी र्मयादा राहणार नाही.
शासनाच्या गत २९ सप्टेंबर रोजीच्या अधिसूचनेनुसार आणि ३0 सप्टेंबर रोजीच्या पत्राप्रमाणे डाळी, खाद्य तेल व खाद्य तेलबिया या जीवनाश्यक वस्तूंवरील साठा निर्बंधास ३0 सप्टेंबर २0१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे; परंतु सद्यस्थितीत राज्यात खरीप हंगामातील सोयाबीनचे उत्पादन जास्त प्रमाणात झाल्याने, बाजारात सोयाबीनच्या दरात घट झाल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. बाजारात सोयाबीनचे दर घसरल्याने मिळेल त्या भावात कमी दराने सोयाबीन विकण्याची वेळ सोयाबीन उत्पादक शेतकर्यांवर आली आहे. या पृष्ठभूमीवर सोयाबीन उत्पादक शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी ५ नोव्हेंबरपासून सोयाबीनला साठा निर्बंधातून वगळण्यात येत असल्याचा आदेश गत ८ नोव्हेंबर रोजी शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकार्यांसह संबंधित अधिकार्यांना देण्यात आला आहे. सोयाबीन साठा निर्बंधातून वगळण्यात आल्याने, सोयाबीनची साठवणूक करण्यास र्मयादेचे बंधन राहणार नाही.
घाऊक व्यापारासाठी परवान्याची नाही गरज!
साठा निर्बंधातून सोयाबीनला वगळण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्र घाऊक व्यापार परवाना आदेश, २0१५ च्या नियम ३ नुसार, सोयाबीनच्या घाऊक व्यापारासाठी परवाना घेण्याची आवश्यकता राहणार नाही, असेही शासनाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
जीवनाश्यक वस्तू अधिनियमांतर्गत लागू असलेल्या साठा निर्बंधातून सोयाबीन वगळण्यात आले असून, यासंबंधी शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाचा आदेश प्राप्त झाला आहे. साठा निर्बंधातून वगळण्यात आल्याने, सोयाबीन साठवणुकीला र्मयादा राहणार नाही.
-अनिल टाकसाळे,
जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला.