गोरगरीब, अभ्यासू विद्यार्थ्यांंची शाळा ‘केशव शिकवणी वर्ग’
By Admin | Updated: September 5, 2014 01:31 IST2014-09-05T01:31:14+5:302014-09-05T01:31:14+5:30
अकोल्यातील निशुल्क सेवा देणारा ध्येयवेडा शिक्षक.

गोरगरीब, अभ्यासू विद्यार्थ्यांंची शाळा ‘केशव शिकवणी वर्ग’
नितीन गव्हाळे /अकोला
सर्वत्र शिक्षणाचं बाजारीकरण झालं. शिक्षणासारखे पवित क्षेत्र आज धंदा होऊन बसलाय. शिक्षक, गुरुजन शब्दामधील ज्ञानदानाचे सेवाव्रत केव्हाच संपले आणि शाळा, महाविद्यालये, कॉन्व्हेटसह कोचिंग क्लासेस ज्ञान देण्यासाठी लाखो रुपये उकळणारे अड्डे बनले. अशाही परिस्थितीत एकाशिक्षकाने मात्र, शिक्षणाचं पवित्र व्रत स्वीकारून गोरगरीब कुटुंबातील; परंतु अभ्यासू विद्यार्थ्यांंना उजेड दाखविण्याचं काम हाती घेतलं. त्या शिक्षकाचं नाव आहे, प्रमोद प्रल्हाद शिंदे.. शिक्षणाच्या बाजारीकरणातही या शिक्षकाने केशव शिकवणी वर्ग सुरू करून निशुल्क शिक्षण उपलब्ध करून देण्याचं व्रतच घेतलं आहे. शिक्षण महागलं. शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेसमध्ये घेण्यात येणार्या लाखो रुपयांच्या डोनेशन, शुल्कामुळे गरीब कुटुंबातील मुलांना शिक्षण घेणं जड झालं. स्पर्धेत टिकून तर राहायचं; परंतु त्यासाठी एवढा पैसा आणायचा तरी कोठून? महागडं शिक्षण घ्यायचं तरी कसं? असे प्रश्न समोर उभे आहेत; परंतु यावर विवेकानंद मराठी प्राथमिक शाळेत १६ वर्षांंपासून शिक्षक म्हणून काम करणारे प्रमोद शिंदे यांनी डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समितींतर्गत तोडगा काढीत, झोपडपट्टी भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांंसाठी निशुल्क केशव शिकवणी वर्ग सुरू केला. त्यांच्या वर्गामध्ये दररोज रात्री ८ ते १0.३0 वाजेपर्यंंत इयत्ता १ ली ते ७ वीमध्ये शिकणारे विविध शाळांचे २५ ते ३0 विद्यार्थी येतात. शिंदे सर त्यांना कृषिनगरातील हनुमान मंदिरामध्ये ज्ञानाचे धडे देतात. पुस्तकी ज्ञानासोबतच संस्कृती आणि संस्काराचेही धडे ते देतात. शिक्षणासारख्या पवित्र कार्याला त्यांनी धंदा न बनविता एक व्रत बनविलं. या सेवाकार्याची प्रेरणा त्यांना रा.स्व. संघाचे माजी प्रचारक रवींद्र भुसारी, जिल्हा सेवाप्रमुख डॉ. अनंत श्रावगी यांच्याकडून मिळाली. बेताची परिस्थिती असल्यामुळे शिंदे सरांनी स्वत:ही श्रीराम घाटे यांच्या शिकवणी वर्गामध्ये शिक्षण घेतले आणि घाटे गुरुजींचा वर्ग पुढे चालविण्याचा वसाही त्यांनी घेतला. ** वैदू झिंगाभोई समाजामध्ये ज्ञानदीप लावण्याचा प्रयत्न अमरावती येथून शिक्षण घेतल्यानंतर शिंदे सरांनी कृषिनगर भागात राहणार्या वैदू झिंगाभोई समाजामध्ये ज्ञानदीप लावण्याचा प्रयत्न केला. समाजातील युवक, निरक्षर महिला, मुलींना गोळा करून त्यांना साक्षर करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांच्या या प्रयत्नाला पुरेसे पाठबळ न मिळाल्याने त्यांचा हा सेवा उपक्रम बंद पडला.