मोर्णेतील जलकुंभी ठरू शकते संजीवनी!

By Admin | Updated: December 13, 2014 00:42 IST2014-12-13T00:42:08+5:302014-12-13T00:42:08+5:30

जलकुंभी काढण्यासाठी व्यापक पुढाकाराची गरज.

Sanjivani can become a hyacinth in Moray! | मोर्णेतील जलकुंभी ठरू शकते संजीवनी!

मोर्णेतील जलकुंभी ठरू शकते संजीवनी!

डॉ. किरण वाघमारे / अकोला
शहरातील मोर्णा नदीच्या प्रवाहात सर्वात मोठा अडथळा बनली आहे, ती या नदीतील जलकुंभी. या जलकुंभीचा नायनाट करणे अतिशय कठीण बनले आहे. दरवर्षी लाखो रुपये यावर खर्च केले जातात; परंतु परिस्थिती जैसे थे आहे. यावर उपाय म्हणून कोल्हापूरच्या धर्तीवर जर जलकुंभीचा उपयोग खत म्हणून केला गेला तर जलकुंभी शेतकर्‍यांसाठी संजीवनी बनू शकते; परंतु यासाठी व्यापक पुढाकार घेण्याची गरज आहे.
वाशिम जिल्ह्यातून उगम पावणार्‍या मोर्णा नदीला प्रदूषणाची लागण होते ती कौलखेडनंतर. कौलखेडच्या पुढे थेट पोलिस प्रशिक्षण केंद्रापर्यंत मोर्णा नदी दूषित झालेली दिसते. मोर्णेकडे नजर टाकली तर असे लक्षात येते की, मोठय़ा प्रमाणात जलकुंभी उगवली आहे. त्यामुळे मोर्णेचे पाणी वाहताना दिसत नाही. जलकुंभीने नदीला व्यापून टाकले आहे. दरवर्षी महापालिकेच्यावतीने जवळपास ५ लाख रुपये जलकुंभीच्या निर्मूलनावर खर्च करण्यात येतो; परंतु त्याचा उपयोग झालेला दिसत नाही. उलट दिवसेंदिवस जलकुंभी अधिकच फोफावत चालली आहे. या वनस्पतीमुळे नदीतील जलचर प्राणी नष्ट झाले आहेत आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्याचा त्रास अकोलेकरांना चांगलाच जाणवू लागला आहे. जलकुंभीने पिण्यायोग्य पाणी प्रदूषित केले आहे.
जलकुंभी पाण्यात असणे घातक आहे. मात्र, पाण्यातून बाहेर काढल्यानंतर ती शेतकर्‍यांसाठी संजीवनी बनू शकते. जलकुंभी पाण्यातून काढल्यानंतर ती गावाच्या बाहेर एका मोठय़ा खड्डय़ात मातीसह पाच थरात टाकली की, ८ महिन्यानंतर त्याचे चांगले खत तयार होते. हे खत ऊस, गहू, ज्वारी, कापूस या सर्वच पिकांसाठी फायदेशीर ठरू शकते. कोल्हापूर महापालिकेलेने रंकाळा तलावातील जलकुंभी काढून तिचा खत म्हणून उपयोग सुरू केला आहे. त्याचे चांगले परिणामदेखील तिथे दिसू लागले आहेत. जलकुंभी काढल्यामुळे पाणी मोकळे होऊन वाहू लागते, परिणामी जलचर प्राण्यांची उत्पत्ती वाढून निसर्गचक्र संतुलित होऊ शकते. सोबतच जलकुंभीचा उपयोग खत म्हणून शेतकर्‍यांना मोफत उपलब्ध होऊ शकते. महागडी खते घेणार्‍या शेतकर्‍यांसाठी जलकुंभी वरदान ठरू शकते. यासाठी महापालिका प्रशासनाने व्यापक विचार करण्याची गरज आहे.

Web Title: Sanjivani can become a hyacinth in Moray!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.